शोभा करंदलाजे यांचे आवाहन : सौंदत्ती तालुक्मयामध्ये सभा
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसने आजपर्यंत दिशाभूलच केली आहे. सर्वसामान्य जनतेची मते घेऊन त्यांनी फसवणूक केली आहे. भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. तळागाळापर्यंत विकास व्हावा हाच या पक्षाचा ध्यास आहे. असे असताना काँग्रेस मात्र भाजपवर टीका करून मते घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाजपच्या पाठिशी ठामपणे राहावे, असे आवाहन भाजपच्या नेत्या शोभा करंदलाजे यांनी केले आहे.
सौंदत्ती तालुक्मयामध्ये सभा घेऊन त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे काम जे अर्धवट आहे ते पूर्ण करायचे असेल तर मंगला अंगडी यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी, कामगार यांना भडकावून भाजपविरोधात काँग्रेसने षङ्यंत्र रचले आहे. मात्र, जनता काँग्रेसच्या या षङ्यंत्रापासून सावरेल व भाजपला मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंगला अंगडी यांनी, मी पहिल्यांदाच निवडणुकीला उतरले आहे. मात्र, माझ्या पतीबरोबर असताना मला विकास कसा करायचा आहे हे जवळून पाहिले आहे. असे सांगून जी अर्धवट कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला संधी द्यावी, असे त्यांनी मतदारांना सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत श्रद्धा अंगडी, उज्ज्वला बडवाण्णाचे यांच्यासह इतर महिला आणि नेतेमंडळी उपस्थित होती.