प्रतिनिधी /काणकोण
संपूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून असलेला आपला व्यवसाय मागच्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे पूर्णपणे बसला आहे. दिवसाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत काणकोणचे टॅक्सीचालक पडले आहेत. असे असताना सरकारने टॅक्सीचालकांना डिजिटल मीटर सक्तीचा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अयोग्य असल्याचे म्हणून या टॅक्सीचालकांनी मीटर न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचे एक निवेदन उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना त्यांनी नुकतेच सादर केले आहे.
या तालुक्यात तळपण, पाटणे, राजबाग, होवरे, पाळोळे, आगोंद किनाऱयांवर टॅक्सी व्यवसाय चालत असून मागच्या दोन वर्षांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय जवळजवळ ठप्प झालेला आहे. त्यातच टॅक्सीचालकांना मीटर सक्तीचा करून अधिक भुर्दंड घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातच ज्यांनी हे मीटर बसविलेले आहेत त्यांचा अनुभव वाईट असून जवळजवळ 100 टॅक्सीचालकांनी मीटर न बसविण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यात नमूद केले आहे. सदर निवेदन या टॅक्सीचालकांनी फर्नांडिस यांना सादर केल्यानंतर हे निवेदन आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करणार आहे त्याचबरोबर टॅक्सीचालक संघटनेच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट घडवून आणणार आहे, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.