प्रतिनिधी/ बेळगाव
साखर आयुक्त कार्यालय बेळगावात सुरू करण्याबाबत जोरदार हालचाली करण्यात आल्या होत्या. मात्र, साखर आणि कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनीच त्याला विरोध केला, असे म्हणत शेतकऱयांनी साखर आणि कामगार मंत्र्यांसमोर तीव्र निदर्शने केली. बेळगावात साखर आयुक्त कार्यालय सुरू करण्याचे ठोस आश्वासन द्या, अशी मागणी शेतकऱयांनी करत त्यांच्या वाहनांसमोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली.
शेतकऱयांच्या अनेक समस्या आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये अनेक तक्रारी आहेत. त्या तक्रारींचे निवारण साखर आयुक्त कार्यालयातूनच होत असते. मात्र, त्यासाठी शेतकऱयांना बेंगळूरला धाव घ्यावी लागत आहे. बेळगावात साखर आयुक्त कार्यालय झाले तर येथेच आम्हाला त्याचा निकाल मिळेल. तेव्हा बेळगावातच साखर आयुक्त कार्यालय सुरू करण्याची जोरदार मागणी शेतकऱयांनी केली.
साखर व कामगार मंत्री येणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सोमवारी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठाण मांडले. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तरीही शेतकऱयांनी त्यांच्यासमोर निदर्शने केली. तुम्ही कामगार व इतरांच्या समस्या सोडविण्यासाठी बोलत आहात. मात्र शेतकऱयांच्या समस्यांबाबत चकार शब्दही काढत नाही, असा संतप्त सवालही यावेळी करण्यात आला. शेतकऱयांच्या या भूमिकेमुळे बराच उशीर गोंधळ माजला होता.
यावेळी सिद्धाप्पा मोदगी, प्रकाश नाईक, चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नाईक यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. पोलिसांनी या शेतकऱयांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱयांनी त्यालाही तीव्र विरोध केला.