प्रतिनिधी/ गोडोली
गोडोलीतील भैरवनाथ ट्रस्ट शववाहिनीच्या अविरत सेवेला तब्बल 13 वर्ष पूर्ण झाली.सातारा आणि परिसरातील हजारो शव घेऊन जाण्यासाठी या शववाहिनीचे मोठे योगदान असून कोविड काळात शहरातील सर्व बाधितांची शव घेऊन जाण्याची जबाबदारी पार पाडण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. मात्र सँनिट्राईझरच्या अति वापराने या गाडीचे मोठे नुकसान झाले असून नगरपालिकेने त्याकडे अद्यापही लक्ष दिले नाही.काम झाले की हात वर न करता सदर गाडीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक खर्च करावा,”अशी मागणी ट्रस्टच्या विश्वस्तांनी ’तरुण भारत’ शी केली आहे.
शहराच्या पुर्व भागाची अडचण लक्षात घेऊन दि.2 ऑक्टोबर 2008 रोजी श्री भैरवनाथ ट्रस्टने नागरिकांच्या सेवेसाठी शववहिनी खरेदी केली.आमदार श्रीमंती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि तत्कालीन नगराध्यक्ष निशांत पाटील यांचे उपस्थित शववाहिनेचे लोकार्पण सोहळा पार पडला होता.शहर आणि परिसरातील आजपर्यंत हजारो मृत व्यक्तींना माहुली येथील कैलास स्मशानभूमीत येथे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याचे अखंड काम या वाहिनीने केले आहे.
मार्च 2019 पासून कोविड 19 मुळे मृत्यू पावलेल्या बाधितांच्या वर अंत्यसंस्कार करण्यासाठी माहुली येथे घेऊन जाण्यासाठी शववाहिनी मिळावी, अशी ट्रस्टकडे सातारचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केलेल्या विनंती केली. सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आघाडीवर असलेल्या या ट्रस्टने
अटीशर्ती शिवाय शववाहिनी सातारा नगरपालिकेकडे या कामासाठी दिली होती.या काळात सॅनिटाईझर प्रचंड वापराने शववाहिनेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
काम झाले की हात वर करणाया नगरपालिकेने या गाडीच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. सदर दुरुस्तीसाठी मोठा खर्च येणार आहे.तो नगरपालिकेने करावा,’अशी मागणी ट्रस्टच्या विश्वस्तांनी केली आहे.