चेन्नई / वृत्तसंस्था
रजनीकांत यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करून आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. दरम्यान, रजनी मक्कल मंदरमचे (आरएमएम) काही कार्यकर्ते पक्षसंघटना सोडून इतर पक्षात सामील होऊ लागले आहेत. यावर आपल्या समर्थक-कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी आपली हरकत नसल्याचे भाष्य रजनीकांत यांनी केले आहे.
आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तरी त्यांनी आपण रजनीकांतचे चाहते आहोत हे विसरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सद्यस्थितीत ‘आरएमएम’मधील अनेक जिल्हाप्रमुख तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच रजनीकांत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. डिसेंबरअखेर रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रणसंग्रामात सामील न होता लोकसेवा करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. तामिळनाडूमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने आतापासूनच राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. सुपरस्टार रजनीकांतच्या राजकारणात प्रवेश न करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संदिग्धता पसरली आहे.