नीवीबन्धोच्छ्वसितशिथिलं यत्र बिम्बधराणां
क्षौमं रागादनिभृतकरेष्वाक्षिपत्सु प्रियेषु।
अर्चिस्तुङ्गानभिमुखमपि प्राप्य रत्नप्रदीपान्
ह्रीमूढानां भवति विफलप्रेरणा चूर्णमुष्टिः।।5।।
अर्थः- तेथे अलकानगरीत, निऱयांची गाठ सोडल्यामुळे सैल झालेले रेशमी वस्त्र प्रियकरांनी प्रेमाने, मोठय़ा हातचलाखीने सोडून नेले असता लज्जेमुळे बावरून गेलेल्या, तोंडल्याप्रमाणे लाल ओठ असलेल्या स्त्रियांची चूर्णमुष्टी(गुलाल इ.ची मूठ) तेजस्वी किरणांमुळे उंच दिसणाऱया रत्नरूप दिल्यावर पडली, तरी व्यर्थ पडल्यासारखी होते.
‘अर्चिस्तुङ्गान्’ म्हणजे रत्नांचे तेज खूप उंचीपर्यंत जाते. ती फार उंचावर आहेत असे वाटते. ‘चूर्णमुष्टिः’ ही कुंकू, गुलाल किंवा अन्य कोणत्यातरी लाल सुवासिक चूर्णाची होय. प्रियकरांनी आपले वस्त्र दूर केल्यामुळे लाजलेल्या स्त्रिया जणू ते दिवे विझवण्यासाठी आपल्या हातातील चूर्ण त्यावर फेकतात. पण ते दिवे नसून रत्ने असतात. त्यामुळे त्यांचा तो प्रयत्न व्यर्थ जात होता.
नेत्रा नीताः सततगतिना यद्विमानाग्रभूमी-
रालेख्यांनां नवजलकणैर्दोषमुत्पाद्य सद्यः।
शङ्कास्पृष्टा इव जलमुचस्त्वादृशाजालमार्गै-
र्धूमोद्गारानुकृतिनिपुणा जर्जरा निष्पतन्ती।।6।।
अर्थः- पुढे नेणारा जो वारा त्याने अलका नगरीच्या सातमजली वाडय़ाच्या गच्चीवर नेलेले तुझ्यासारखे मेघ तिथल्या चित्रांची आपल्या नवजलबिंदूंनी नासधूस करून जणू काही घाबरतात. त्यामुळे त्वरित धुरांडय़ातून बाहेर पडणाऱया धुराचे अनुकरण करीत पिंजून त्या धुरांडय़ातून बाहेर पडतात.
‘यद्विमानाग्रभूमी’ ऐवजी ‘ये विमानाग्रभूमी’ आणि ‘नवजलकणैः’ ऐवजी ‘स्वजालकणिका’ असेही पाठ आहेत. ते वरील पाठापेक्षा अधिक चांगले आणि बरोबर असावेत असे टीकाकारांचे मत आहे.