मुंबई/ ऑनलाईन टीम
राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तालिका अध्यक्षांच्या चेंबर आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामुळ तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबीत केलं आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका मांडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.
लोकप्रतिनिधींकडे जनतेची अपेक्षा असते. माझ्या आयुष्यात काही बदल घडला पाहिजे असे जनतेला वाटते. तसेच हा बदल जिथे घडतो त्या ठिकाणी लोकप्रनिधींना जनता पाठवते. मात्र, काल जे काही दृश्य पाहायला मिळालं ते शरमेने मान खाली जावी असं कृत्य होतं. हे एका जबाबदार पक्षाने केलं. हे आम्ही घडवलेलं नव्हतं, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
भास्कर जाधव यांच्यासोबत झालेलं वर्तन निंदनीय आहे. राज्यात असा पायंडा पडता कामा नये. असा पायंडा पडायचा नसेल तर सर्वांनी मिळून ठरवायला हवं. दोन दिसांच्या अधिवेशनाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तुम्ही ऐकला. या दोन दिवसांमध्ये आम्ही जनतेला आनंदी तसेच समाधान देऊ असं काम केलं आहे. यावेळी सर्व विधानसभेत, विधानपरिषदेत जे सदस्य उपस्थित होते त्यांना धन्यवाद देतो. तसेच ज्या व्यक्तींकडून जे घडू नये ते घडले ते सुधारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या पत्रकारपरिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब यांची देखील उपस्थिती होती.