सिमेंटच्या मलमपट्टीने तडे बुजविण्याचा प्रयत्न
कणकवली:
यापूर्वी कणकवली शहरातील उड्डाण पुलाचे काही भाग ठिकठिकाणी कोसळल्याच्या घटना घडलेल्या असतानाच आता कासार्डे येथे होत असलेल्या उड्डाण पुलाच्या भिंतीच्या कोपऱयांनाही तडे जात असल्याचे दिसत आहे. चौपदरीकरणाचे काम करणाऱया कंपनीकडून तडे गेलेल्या ठिकाणी केवळ सिमेंट लावले जात आहे. ग्रामस्थांनी विचारणा केली असता हे पूल मजबूत असल्याचे सांगितले जाते. पण, पूल मजबूत असेल, तर तडे गेलेल्या ठिकाणी सिमेंटची मलमपट्टी करण्याची गरज काय? असा सवाल ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
या उड्डाण पुलाचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. तरीही भिंतींना तडे जात असल्याने, येत्या काळात वाहतूक सुरू होईल, तेव्हा हा पूल कितपत सुरक्षित असेल, असा सवालही ग्रामस्थ करत आहेत. तळगाव ते झाराप चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यांत सुरू आहे. त्यापैकी तळगाव ते कलमठ येथील चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत लोकांच्या मनात शंका वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी पुलावरील भराव खचून डांबरीकरणालाच भेगा पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरही अशाच प्रकारे सिमेंट व डांबर टाकून तात्पुरती मलमपट्टी करून भेगा बूजविण्याचा प्रयत्न झाला.
कणकवलीत उड्डाण पुलाबाबत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती कासार्डेत होऊ नये, यासाठी या संपूर्ण पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांनी लक्ष घालावे, लोकप्रतिनिधींनीही उड्डाण पूल दर्जेदार होण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.