’वाणिज्य उत्सव’ प्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील लॉजिस्टिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून स्वयंपूर्ण गोव्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गोव्यातील सर्व उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर केला जाईल, तसेच किनारपट्टी राज्यातून निर्यात व्यवहारांना चालना देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
दोनापावला येथे आंतरराष्ट्रीय केंद्रात मंगळवारी आयोजित ’वाणिज्य उत्सव’ निर्यात परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवग्नी वर्षानिमित्त केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खाते तसेच गोवा उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खाते, कापूस वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवशीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि अन्य अधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी ‘नवीन संधींसह नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करून गोव्याची निर्यात क्षमता वाढवणे हे आमचे ध्येय आहे. गोव्याला निर्यात केंद्र आणि उर्वरित देशासाठी एक आदर्श निर्यात राज्य बनविणे व त्याद्वारे आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न पूर्ण करता येईल, असे सांगितले.
केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना, विविध बंदरे, रेल्वे, रस्ते, विमानतळ, मुबलक जलसंपदा, उत्कृष्ट जीवनशैली, पायाभूत सुविधा आणि संसाधने यांच्या उपलब्धतेमुळे गोव्याकडे उच्च निर्यात क्षमता आहे, असे सांगून राज्यातील कंटेनर सेवा आणि पर्यटन क्षेत्राला शक्मय तितके पाठबळ देण्याची विनंती उद्योग क्षेत्राला केली.
गोव्यात निर्यातीबाबत झालेली प्रगती, निर्यात क्षमतेचे प्रदर्शन, परिसंवाद, राज्यातील निर्यात परिस्थिती सुधारण्यासाठी धोरणांवर लक्ष केंद्रित करणे व सर्व संबंधित भागधारकांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.