माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन; लोकमान्य सोसायटीच्या उंब्रज शाखेचे स्थलांतर
प्रतिनिधी/ उंब्रज
लोकमान्य टिळकांचा वारसा पुढे चालवण्याचा विडा ‘तरुण भारत’चे संस्थापक सल्लागार किरण ठाकुर यांनी उचलला आहे. लोकांना मदत करण्याचा गुणधर्म त्यांच्याकडे असून लोकांची गरज ओळखून जी माणसं काम करतात, ती यशस्वी होतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात किरण ठाकुर यांना खरी लोकमान्यता आहे. ते चालवत असलेले समाजोपयोगी उपक्रम भविष्यात आणखी वृद्धिंगत होण्यासाठी यापुढील काळात शासन स्तरावर आवश्यक मदत करणार असल्याची ग्वाही माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.
कराड तालुक्यातील उंब्रज येथील लोकमान्य को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थलांतरीत शाखेचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी लोकमान्यचे संस्थापक व ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, सरपंच योगराज उर्फ माणिक जाधव, जिल्हा परिषद सदस्य विनिता पलंगे, पंचायत समिती सदस्या सुषमा नागे, तळबीडचे सरपंच जयवंराव मोहिते, उपसरपंच सुनंदा जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, गजानन धामणीकर, लोकमान्यचे झोनल मॅनेजर सुशील जाधव, असिस्टंट रिजनल मॅनेजर हर्षद झोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, स्वराज्याला मदत करणारी माणसे या मातीत आहेत. लोकमान्यांचा वारसा आपण चालवत आहात. बेळगावविषयी मला आस्था आहे. येथील प्रश्न नक्कीच कुणाच्या तरी कानात घालू. मात्र काही झाडांना उशिरा फळे लागतात, त्यातून लोकांचे कल्याण होत असते. लोकमान्य सोसायटीने अधिक चांगले उपक्रम राबवावेत. उंब्रज येथे लोकमान्य संस्थेची शाखा निर्माण करून या परिसरातील लोकांना आर्थिक जीवनमान उंचावण्याचे काम होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात संस्थेने कोटींची उड्डाणे घ्यावीत.
उंब्रजच्या मातीला ऐतिहासिक परंपरा आहे. गोपाळ गणेश आगरकरांचे उंब्रज हे गाव आहे. नाक्याचे व मोक्याचे ठिकाण आहे. या गावात ठाकुर यांनी महामार्गालगत आणलेली लोकमान्यची शाखा लोकांना सोईची ठरेल. ही संस्था सहकाराचा मजबूत करणारी आहे. किरणरावांच्या नेतृत्वामुळे ती आणखी मजबूत होईल. संस्थेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यातून संस्थेने वेगळेपण दाखवले असून लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने उद्योगजगताला मदत मिळेल, असे खासदार पाटील यांनी सांगितले.
सुराज्य निर्माण करण्यासाठी ‘लोकमान्य’ची स्थापना
किरण ठाकुर म्हणाले, 1995 साली बेळगाव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेतून लोकमान्य हे नाव देऊन ही सोसायटी सुरू केली. आज बेळगावसह गोवा, महाराष्ट्रात लोकमान्यच्या शाखा विस्तारल्या आहेत. एकेकाळी आम्ही देणग्या मागत फिरत होतो. आज लाखोंच्या देणग्या गोरगरिबांच्या मदतीसाठी देण्याचे बळ लोकमान्यवर सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आले आहे. कर्नाटक सरकारचा प्रत्येक कामात विरोध होतो, मात्र प्रवाहाच्या विरोधात जाऊन आम्ही सोसायटी काढली. आज भारतात पहिल्या क्रमांकाचे दहा कोटी सभासद असणारी ही सोसायटी आहे. छोटय़ा उद्योगांना आर्थिक मदत झाली पाहिजे, यासाठी सहकार क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. आज खेडय़ापाडय़ातील लोकांसाठी ही संस्था उभी राहत आहे. संस्थेने कोटींच्या देणग्या दिल्या आहेत. लोकमान्य टिळकांनी बेळगावातून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही घोषणा दिली. त्यांनी जो असंतोष निर्माण केला, त्यातूनच स्वातंत्र्याची मशाल पेटली. या मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी लोकमान्य उभी केली आहे.
देवराज पाटील म्हणाले, लोकांचा विश्वास संपादन करण्याचे काम लोकमान्य सोसायटीने केले आहे त्याचबरोबर सामाजिकता जपण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. ग्राहकांना चांगली सुविधा दिली जात आहे. उपसरपंच सुनंदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी लोकमान्य संस्थेच्यावतीने प्रवीण जाधव, सूर्यकांत जाधव, रूपाली गणेश चव्हाण, मोहन चौधरी, सर्जेराव बोंगाने, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी प्रकाश मुसळे, मोतीराम ठोके, रोटरीचे अध्यक्ष अजित जाधव, कमलाकर पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन होडगे, आदित्य भेंडे, सचिन जगडे यांच्यासह परिसरातील ठेवीदार, ग्राहक व ग्रामस्थ उपस्थित होते.