सकाळी सात ते अकरापर्यंतच परवानगी : या वेळेअतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास फौजदारी – जिल्हाधिकारी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध घालूनसुद्धा काटेकोर पालन होत नसल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आता सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश काढले आहेत.
संपूर्ण राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 एप्रिल ते 1 मेपर्यंत कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लागू केले आहेत. मात्र हे निर्बंध काटेकोरपणे पाळले जात नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी एक बैठक घेऊन सकाळी 7 ते 11 या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे आदेश दिले व याबाबत स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱयांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱयांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विपेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, खाद्य पदार्थांची सर्व दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी), कृषी अवजारे व शेतमालाशी संबंधित सेवा, पशुखाद्य विक्री सेवा, पावसाळी हंगामासाठी व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी साहित्य विक्री करणारी दुकाने ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. तथापि या दुकानांना सकाळी सात ते रात्री आठपर्यंत घरपोच सेवा देता येईल, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
तसेच यापूर्वी 14 एप्रिलला कडक निर्बंध लागू करून काय सुरू राहील व काय बंद राहील हे जाहीर केले आहे. ते आदेश व निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू आहेत. जनतेने विनाकारण न फिरता घरीच थांबावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.