कीर्तन संमेलनाच्या परिसंवादात वक्त्यांचे मत
सांस्कृतिक प्रतिनिधी / फोंडा
आजची तरुण पिढी किर्तनाकडे वळू लागली आहे, ही सकारात्मक बाब असून आशावाद जागवणारी आहे. किर्तनाच्या माध्यमातून समाजातील विविध विषय योग्य रित्या हातळताना, ही कला अधिक लोकाभिमुखण आणि प्रभावी बनविण्याची गरज ‘कीर्तन संस्कार’ या परिषसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केली. गोमंतक संत मंडळ संचालीत फोंडा कीर्तन विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन संमेलनाच्या उद्घाटनपूर्व सत्रात हा परिसंवाद झाला. खांडेपार येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या सभामंडपात रविवारी हे एकदिवशी संमेलन देवस्थानच्या सहकार्याने भरविण्यात आले होते.
पत्रकार नरेंद्र तारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात निवृत्त सनदी अधिकारी नारायण नावती, लेखिका दीपा मिरींगकर व पत्रकार सदानंद सतरकर यांचा सहभाग होता. कीर्तन हे केवळ पारंपरिक व साचेबद्ध न राहता समाजातील आजचे ज्वलंत प्रश्न त्यातून मांडता येऊ शकतात, असे मत सदानंद सतरकर यांनी व्यक्त केले. समुपदेशानचे ते योग्य माध्यम असून पर्यावरणाचे महत्त्व व जागृती, युवा पिढीसमोरील विविध प्रश्न किर्तनातून पुढे आले पाहिजेत. लोकशिक्षण व समाजप्रबोधाचे माध्यम म्हणून आजही या कलेचे महत्त्व कमी झालेले नाही. आजच्या तांत्रिक माध्यमांचा किर्तनाच्या प्रसारासाठी योग्य वापर केल्यास त्याची व्याप्ती वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
कीर्तन ही नारदमुनींकडून आलेली परंपरा असून नवविधा भक्तीमार्गातील नाम संकिर्तनाचा तो प्रभावी मार्ग आहे. किर्तनातून समाज परिवर्तन, सुबुद्ध समाजाची निर्मिती व सुशानही संभव आहे, असे दीपा मिरींगकर यांनी सांगितले. भक्ती हा किर्तनाचा पाया असून अनेक गोष्टींचा समुच्चय त्यामध्ये आढळतो. माणसाच्या जडण घडणित कीर्तन संस्कृती आणि संस्कार पोषक असल्याचे त्यांनी नमूद केले.
किर्तनातून उत्तम संस्कार व ज्ञानामृत प्राप्त होते. भौतिक सुखाच्या जाळय़ात अडकलेला माणूस सुख आणि समृद्ध जीवनाच्या शोधात वणवण भटकत आहे. आत्मिक सुखाच्या प्राप्ती अभावी तो समाधानी होऊ शकत नाही. चिंतनशिलता, सहनशक्ती, अल्पसंतुष्ट वृत्ती हे श्रद्धाळू माणसाचे बळ आहे. परमेश्वरावरील श्रद्धा व भक्तीमधून हे शक्य आहे. आपले आचरण शुद्ध असेल तरच आपण भावी पिढीसमोर आदर्श निर्माण करु शकतो. किर्तनातून उत्तम संस्कार प्राप्त होत असतात, असे नारायण नावती म्हणाले. अभ्यासक्रमांमध्ये संस्कारक्षम विषयांचे ज्ञान देणारे धडे समाविष्ट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
समाजातील समतोल राखण्यासाठी संस्कार महत्त्वाचे आसून किर्तनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य असल्याचे नरेंद्र तारी यांनी आपल्या अध्यक्षीय विवेचनात सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास ते वरदानच ठरणार आहे. किर्तनाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणे शक्य असून समाजातील अनिष्ठ गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. श्रोत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. सुहासबुवा वझे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदर कामत यांनी तर दुर्गाकुमार नावती यांनी आभार मानले.