प्रतिनिधी / फोंडा
कुंडई येथील चिकलपाईण खाजन शेतीच्या बांधाला तीन ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. शिवाय जवळपास असलेल्या घरापर्यंत पाणी पोचले आहे. नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे काही ठिकाणी कमकुवत झालेल्या बांधाला ही भगदाडे पडली तरी येथील मानस वेळीच खाली केली असती तर ही परिस्थिती ओढवली नसती अशी तक्रार येथील काही शेतकऱयांनी केली आहे.
जगन्नाथ के. नाईक या शेतकऱयाने नुकतीच फोंडा मामलेदारांना लेख तक्रार करुन मानशेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या 26 एप्रिल रोजी फोंडा मामलेदारांनी मानसवाल्याला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. या नोटीसीनंतर शेतीमधील पाणी खाली न केल्याने व काही दिवसांत आलेले चक्रीवाद व दोन दिवस सतत कोसळलेल्या पावसामुळे बांधाला भगदाडे पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मामलेदारांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी या शेतकऱयाने केली आहे.
दरम्यान चिकलपाईण खाजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतीच्या बांधाला तीन ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यापैकी एक साधारण 25 मिटरचे मोठे भगदाड आहे. या भगदाडामुळे शेती तर पाण्याखाली गेलीच आहे, शिवाय जवळपास असलेल्या साधारण नऊ घरांपर्यंत पाणी पोचले आहे. चिकलपाईण शेतीचा संपूर्ण बांध कमकुवत झाला असून त्याच्या दुरुस्तीकामासाठी रु. 55 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. आठ महिन्यापूर्वी बांधाच्या दुरुस्तीकामाचे सर्वेक्षण करुन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ही फाईल कृषी खात्यामध्ये अडकून पडल्याचे विजेश नाईक यांनी सांगितले.