तुटवडय़ामुळे नागरिकांची परिस्थिती
प्रतिनिधी / बेळगाव
18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना 1 मेपासून लस देणार असे जाहीर झाले खरे. मात्र, लसीचाच पत्ता नाही आणि नागरिकांना कोणी लस देता का लस, असे विचारत फिरण्याची वेळ आली आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि तालुका आरोग्य खात्याकडे लसीचा किती साठा आला, याचीच माहिती उपलब्ध नसल्याने सध्या गंभीर परिस्थिती आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे आहे. याची जाणीव नागरिकांनाही उशिरा झाल्यामुळे सध्या तुटवडा भासू लागला असून काही जण पहिल्या डोससाठी तर असंख्य मंडळी दुसऱया डोससाठी प्रतीक्षेत आहेत.
सुरुवातीला लस घ्या, असे करण्यात आलेले आवाहन गांभीर्याने न घेतल्याने आता मात्र त्याचा फटका बसू लागला आहे. लसीचा पुरवठा योग्य वेळेत होत नसल्याने समस्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या उपलब्ध कोव्हिशिल्ड लसीचा वापर करून प्रशासन दुसऱया डोससाठी येणाऱया व्यक्तींची सोय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता राज्य आरोग्य खात्याकडून आलेल्या आदेशानुसार उपलब्ध लसींपैकी 70 टक्के साठय़ाचा वापर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ऑनलाईन रजिस्टेशन करून लस घ्यावी, असे आवाहन केल्यानंतर लसीसाठी गर्दी करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अद्याप रजिस्टेशन न करताच लसची विचारणा करण्यासाठी येणाऱयांचे प्रमाण अधिक आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने डोसच्या तुटवडय़ामुळे डोकेदुखी वाढली असल्याचे सांगितले. सध्या 30 टक्के लस पहिला डोस देण्यासाठी वापरल्या जाणार असून उर्वरित लसींचा वापर अधिक प्राधान्य देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
लसीचा पुरवठा केव्हा होईल याबाबत प्रशासनाकडे उत्तर नाही. यामुळे संभ्रमावस्था आहे. लस घेणाऱयांपैकी अनेकांचा कोविडपासून बचाव होत असल्याचे प्रामुख्याने जाणवून आल्यानंतर मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर राज्य सरकारने योग्य तो पर्याय काढावा, अशी मागणी वाढली आहे.