निवडे येथे जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कृषी धोरणाच्या जनजागृतीसाठी कृषी ऊर्जा पर्वा अंतर्गत कोल्हापूर ग्रामीण विभागातील गगनबावडा तालुक्यातील निवडे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग तात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानंतर कृषी आकस्मित निधीतून मनदूर येथे जिह्यात पहिली वीज जोडणी देण्यात आली.
या मेळाव्यास अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कोल्हापूर ग्रामीण एक विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील, पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील, मनदुरचे सरपंच यशवंत जाधव, तिसंगीचे सरपंच सलाउद्दीन योडगे, निवडे उपसरपंच अश्विनी पाटील, निवडे माजी सरपंच बाळू पाटील यांची उपस्थिती होती. अधीक्षक अभियंता कावळे यांनी गगनबावडा उपविभागातील सर्व शेतकरी 50 टक्के वीज बील माफीच्या या योजनेत सहभागी होऊन गगनबावडा उपविभाग लवकरच 100 टक्के थकबाकीमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी कृषी धोरणाबाबत उपस्थित शेतकर्यांना माहिती दिली. मेळाव्यात थकबाकीमुक्त शेतकरी ग्राहकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या जनमित्रांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
मौजे मनदुर येथे कृषी आकस्मिक निधीतून एरियल बंच केबलद्वारे (180 मीटर ) लघुदाब वाहिनी उभारून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. बजरंग तात्या पाटील यांचे हस्ते अर्जदार श्री. दगडू आत्माराम पाटील यांना कोल्हापूर जिह्यात पहिली कृषी पंप वीज जोडणी देण्यात आली. मनदूर गावातील 78 टक्के कृषी पंप ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत वीज बिल भरले आहे. गगनबावडा उपविभागात 2740 कृषी ग्राहकांपैकी 1119 इतक्या ग्राहकांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे. मेळावा यशस्वीतेसाठी उपविभागीय अभियंता अरुण मोडेकर, शाखा अभियंता र. श्री. मोहिते, ए. जी. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.