प्रतिनिधी / सांगली
कृषी सुधारणा विधेयक कायदा करून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिकदृष्ट्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यांची माहिती सोप्या शब्दात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कृषी सुधारणा विधेयक 2020 पुस्तिका काढली आहे. त्याचे प्रकाशन राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना सन्मानजनक मोबदला मिळण्यासाठी आणि त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कृषी सुधारणा विधेयक 2020 आणले. त्याला संसदेने मंजुरीही दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेला माल देशात कुठेही आणि कुणालाही विकता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला आता त्याच्या मालासाठी संपुर्ण देशाची बाजारपेठ खुली झाली आहे. मात्र या कायद्यावरुन सध्या विरोधक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. त्यांना चुकीची माहिती देऊन सरकार विरोधात आंदोलन करण्यास उद्युक्त करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या कायद्यातील तरतुदी सोप्या शब्दात पोहोचवण्याची गरज होती. ती लक्षात घेऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली आहे.
त्यामुळे या कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंका आणि भिती दूर होण्यास मदत होणार आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, युवा मोर्चा महाराष्ट्र देशाध्यक्ष विक्रांत पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष धीरज सुर्यवंशी, सचिव विश्वजित पाटील, कृष्णा राठोड, आदी उपस्थित होते.