प्रतिनिधी/ बेळगाव
विजेचे बिल भरण्यास एक दिवस जरी वेळ झाला तरी घरचे वीज कनेक्शन तोडण्यात येते. परंतु मागील अनेक वर्षांपासून विजेचे बिल न भरणाऱया कॅन्टोन्मेंट बोर्डवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सप्टेंबर महिन्यापर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डने 2 कोटी 41 लाख रुपयांचे बिल थकविले आहे. त्यामुळे इतकी मोठी रक्कम थकविण्यात आली असतानाही हेस्कॉम प्रशासन गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात पथदीप व पाणीपुरवठा करण्यासाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड वेळच्या वेळी विजेचे बिल भरत होते. परंतु मागील काही वर्षांपासून बिल भरण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. मध्यंतरी हेस्कॉमने कनेक्शन तोडण्याची कारवाई केल्यानंतर काही रक्कम भरण्यात आली होती. परंतु पुन्हा ही रक्कम भरण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या 2 कोटी 41 लाख रुपयांचे थकीत विजेचे बिल आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे राखीव निधी उपलब्ध असतानाही विजेचे बिल भरण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. कोणताही सरकारी निधी मंजूर झाल्यानंतर बिल भरण्यासाठी निधी देण्यात येतो. त्यामुळे तो निधी बिलासाठी का वापरला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हेस्कॉमचे कर्मचारी सर्वसामान्य ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यास जी तत्परता दाखवितात तीच तत्परता ते अशा वेळी का दाखवत नाहीत, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सूचना करूनही दुर्लक्ष
प्रत्येक महिन्याला सर्व सरकारी कार्यालयांना वीज बिलाची नोटीस पाठविण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डने विजेचे बिल थकविले आहे. यामुळे ही रक्कम आता वाढत असून वारंवार सूचना करूनही बिल भरण्यात आलेले नसल्याचे हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंते अरविंद गदगकर यांनी सांगितले.