प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प येथील वाल्मिकी मंदिरची जागा कॅन्टोनमेंट बोर्डची असून, सदर जागेच्या लीज कराराची मुदत दि. 31 मार्च 2020 रोजी संपु÷ात आले आहे. त्यामुळे सदर जागेचा ताबा कॅन्टोन्मेंट बोर्डकडे देण्यात यावा. अशी नोटीस कॅन्टोन्मेंट बोर्डने वाल्मिकी म्हेतर समाज सुधारणा मंडळाला बजावली आहे. त्यामुळे दररोज पुजा अर्चा करण्यात येणारे मंदिर कॅन्टोन्मेंट बोर्डकडे हस्तांतर कसे करायचे असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारीत येणाऱया बहुतांश जागा संरक्षण खात्याच्या आहेत. काही जागा बाजारपेठेसाठी तर बहुतांश जागा मिलिटरी प्रशिक्षण केंद्रासाठी देण्यात आली आहे. तसेच ब्रिटीश काळातील लष्करी अधिकाऱयांना राहण्यासाठी बंगले बांधण्यात आले होते. त्यामुळे सदर बंगले आणि जागा लिज कराराने सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आल्या होत्या. यापैकी काही बंगले व जागा कायमस्वरूपी देण्यात आल्या आहेत. तर काही जागा मर्यादीत कालावधीकरीता लिज पद्धतीने देण्यात आल्या होत्या. कॅम्प येथील वाल्मिकी मंदिर असलेली 4800 चौरस फूटाची जागा मेहतर समाज सुधारणा मंडळाला लीज कराराने देण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या म्हणण्यानुसार सदर जागा दि. 1 एप्रिल 1921 रोजी कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा 1899 नुसार 99 वर्षाच्या कराराने देण्यात आली होती. त्यामुळे सदर जागेच्या लीज कराराची मुदत दि. 31 मार्च 2020 रोजी संपु÷ात आली आहे. त्यामुळे मालमत्तेचा ताबा कॅन्टोन्मेंट बोर्डकडे हस्तांतर करावा अशी नोटीस सुधारणा मंडळाला बजावण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याठिकाणी लहानसे वाल्मिकी मंदिर होते. सदर मंदिर ब्रिटीश काळापासून असल्याने 1912 पासून जागेचा ताबा सुधारणा मंडळाकडे आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डला जागेचा मोबदला म्हणून वर्षाला 1 रूपये भाडे देण्यात येत होते. कालांतराने या ठिकाणी असलेले मंदिर जीर्ण झाल्याने 1991 मध्ये कॅन्टोन्मेंटची परवानगी घेऊन मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. तसेच मंदिराच्या देखभालिकरीता जागेच्या आवारात व्यवसायिक गाळे निर्माण करण्यात आले आहे. गाळय़ाच्या माध्यमातून मिळणाऱया उत्पन्नातून वाल्मिकी मंदिराचा विकास आणि देखभाल केली जाते. तसेच त्या ठिकाणी समुदाय भवन उभारण्यात आले असून, समाज बांधवांना विविध उपक्रम, विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी न नफा ना तोटा या तत्वावर समाज भवन उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे वाल्मिकी समाजबांधवांना या मंदिराचा उपयोग होत आहे. पण कॅन्टोन्मेंट बोर्डने हस्तांतर करण्याची नोटीस बजावल्याने खळबळ माजली आहे. वाल्मिकी समाज बांधव या ठिकाणी पूजा अर्चा व विविध उपक्रम राबवित असल्याने सदर मंदिर हस्तांतर कसे करायचे असा मुद्दा उपस्थित झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने दिलेल्या नोटीसीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर मंदिर हस्तांतर करण्याच्या सूचनेमुळे वाल्मिकी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सदर मंदिरचा ताबा घेऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.