विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांचा घणाघात
प्रतिनिधी /बेळगाव
आजपर्यंतचा सर्वात मोठा ओला दुष्काळ पडला आहे. असे असताना केंद्र सरकारकडून राज्याला एकही पैसा मिळाला नाही. तरीदेखील केंद्राकडून भरपूर मदत मिळाली, असे सांगून राज्याला मदत मिळू नये यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत का? असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी विधानपरिषदेत केला. दुष्काळाबाबत बोलताना त्यांनी राज्य सरकारचे शेतकऱयांकडे आणि सर्वसामान्य जनतेकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोपही केला आहे.
केंद्राकडे योग्यप्रकारे पाठपुरावा करणे गरजेचे होते. मात्र राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला नाही. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे 5 हजार कोटींची हानी झाली आहे. असे असताना सरकारकडून केवळ 1311 कोटी रुपये दिले गेले आहेत. हा निधी देण्याचा प्रकार म्हणजे राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसामुळे भात, सोयाबिन, मक्का, मिरची, जेंधळा यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान पाहता तातडीने केंद्र सरकारने विशेष निधी देणे गरजेचे होते. मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारकडे साफ दुर्लक्ष केले आहे. 2019 पासून आतापर्यंत 2.5 लाख कोटी रुपयांची हानी झाली आहे. मात्र केंद्र सरकारने 2020 मध्ये 1650 कोटी, 2021 मध्ये 1311 कोटी असे एकूण 2970 कोटी रुपये राज्याला दिले आहेत. नुकसान 2.5 लाख कोटींचे तर नुकसानभरपाई 2970 कोटीची, यावरून केंद्राने कर्नाटककडे कसे दुर्लक्ष केले आहे, हे दिसून येत आहे.
राज्य सरकारकडून पेट्रोल तसेच इतर इंधनाच्या माध्यमातून मोठा कर मिळतो. केंद्र सरकारचा 2013-14 मध्ये काँगेस सरकार असताना 16.65 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर झाला होता. त्यानंतर आता 2020-21 मध्ये 34.93 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. जवळपास दुप्पटीपेक्षाही अधिक अर्थसंकल्प जाहीर केला असताना त्यामध्ये नुकसानग्रस्तांसाठी तरतूद मात्र तुटपुंजी झाल्याचे दिसून येत
आहे.
आम्ही गरीब असल्याचे केंद्र सरकारला दाखवून द्या
राज्य सरकारने नुकसानभरपाई झालेल्या सर्वांना तातडीने निधी उपलब्ध करावा. केंद्र सरकारने आम्हाला भरपूर निधी दिला असे सांगू नये. अन्यथा केंद्र सरकारचे यामध्ये फावेल. तेव्हा आम्ही गरीब असल्याचे केंद्र सरकारला दाखवून द्या. त्यासाठी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी आणि राज्यातील खासदारांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.