नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खलिस्तानच्या मुद्दय़ावर प्रक्षोभक संदेश प्रसारित करणारी अनेक ट्विटर खाती बंद करण्याची प्रक्रिया ट्विटरने सुरू केली आहे. केंद्र सरकारने ट्विटरला ही खाती बंद करण्याची सूचना केली होती. ती न पाळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर जवळपास 700 खाती बंद करण्यात आली.
केंद्र सरकारने इशारा दिल्यानंतर ट्विटरने सरकारशी बोलणी करण्याची तयारी दर्शविली होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही प्रश्न आहे. त्यामुळे खाती बंद करत असताना लोकांच्या स्वातंत्र्यावरही गदा येऊ नये हे पहावे लागते, असे ट्विटरचे म्हणणे आहे. मात्र, आम्ही भारत सरकारच्या चिंता समजू शकतो आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यास प्रारंभ केलेला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले.
फार्मर्स जेनोसाईड हॅशटॅग
भारतात शेतकऱयांचे शिरकाण सुरू आहे, अशा अर्थाचे ट्विटर संदेश प्रसारित करण्यात येत आहेत. त्यासाठी फार्मर्स जेनोसाईड या नावाचे हॅशटॅग उपयोगात आणण्यात येत आहे. या हॅशटॅगसंबंधातील 257 खाती बंद करण्यात आली आहेत. यापैकी 126 खाती काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली होती.
कंपनीने पत्रकार, माध्यमे, कार्यकर्ते आणि राजकारणी यांच्या खात्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. कारण हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. भारताच्या कायद्यानुसार आम्ही धोरण ठरविलेले आहे, असे ट्विटरचे म्हणणे आहे.
ट्विटरला पर्याय म्हणून भारतीय तंत्रज्ञांनी ‘कू’ हे समाजमाध्यम विकसीत केले आहे. यामुळे ट्विटरच्या एकाधिकाराला तीव्र स्पर्धा निर्माण होत आहे. भारतात ‘कू’ डाऊनलोड करण्याच्या प्रमाणात गेल्या सहा महिन्यांमध्ये चौपट वाढ झाली. याचा दबाव ट्विटरवर पडत आहे. ‘कू’ हे भारतीय तंत्रज्ञान असल्याने ते भारताच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे ट्विटरला धोरण बदलावे लागेल अशी शक्यता आहे.