ऑनलाईनद्वारे पार पडला इंडक्शन प्रोग्राम : सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संस्थेबद्दल मान्यवरांनी दिली सविस्तर माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी तसेच स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा दि. 14 ते 19 डिसेंबर या कालावधीत प्रवेश कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात एआयसीटीईच्या दिशानिर्देशांनुसार पार पडला. मानवी मूल्ये आणि समग्रपणे समाज समजून घेणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संबंध प्रस्थापित करणे, हा या कार्यक्रमाचा मूलभूत उद्देश होता. महाविद्यालयातील वातावरण तसेच संस्कृतीची नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचाही हेतू या कार्यक्रमामागे होता.
केएलएस जीआयटीचे प्राचार्य डॉ. जयंत के. कित्तूर यांनी नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत करून या प्रवेश कार्यक्रमाचा प्रारंभ केला. प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संस्थेची संक्षिप्त माहिती दिली असून यात पायाभूत सुविधा, शैक्षणिक दर्जा, कामगिरी इत्यादींचा समावेश होता.
प्रवेश कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भाग घेतला होता. जागतिक मानवी मूल्ये, आरोग्य जागरूकता, तरुण अभियंत्यांसमोरील संधी अन् आव्हाने, सामाजिक संवेदनशीलता, तणाव व्यवस्थापन, संघबांधणी आणि कॅम्पस ओरिएंटेशन सेशन्स इत्यादींच्या तज्ञांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तरुण अभियंत्यांसमोरील संधी आणि आव्हाने या विषयावर डीआरडीओतून निवृत्त झालेले ज्येष्ठ संशोधक प्राध्यापक सुधींद्र हल्दोद्देरी यांनी विचार मांडले. सल्लागार, निर्मिती, प्रोटोटायपिंग, संशोधन इत्यादी क्षेत्रात अमाप संधी असल्याचे हल्दोद्देरी यांनी सांगितले. अभियंत्यांच्या वाचनाच्या महत्त्वाला आघाडीचे उद्योजक डॉ. बसवराज जगजंपी यांनी अधोरेखित केले. साहित्य वाचनामुळे विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लख होण्यासह सखोल विचार करण्यास मदत होते, असे जगजंपी म्हणाले. अटेंडन्स (उपस्थिती), अटेंटिव्ह (एकाग्र) आणि असाईन्मेंट्स (कार्य) यांचे आयुष्यात पालन विद्यार्थ्यांच्या वाटचालीत आवश्यक असल्याचे उद्गार जीवन तसेच मेडिटेशन प्रशिक्षक सुब्रमणी सरोदे यांनी काढले.
आशावादासह सकारात्मक विचार ही प्रभावी तणाव व्यवस्थापनाची गुरुकिल्ली असल्याचे डॉ. अश्विनी बेळगावकर यांनी म्हटले. तणाव व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांची मानसिकता या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. सकारात्मक विचार, लक्ष्यनिश्चिती आणि कामगिरी प्राप्त करण्याच्या मुद्दय़ांवर त्यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले.
सद्यस्थितीतील आरोग्य जागरूकता या मुद्दय़ावर डॉ. निवेदिता कोडलीमठ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. महामारीच्या काळात आवश्यक खबरदारींसंबंधी त्यांनी महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना केल्या. क्रीडा, शारीरिक शिक्षण आणि तंदुरुस्त जीवनासाठी योगाचे महत्त्व या विषयावर डॉ. पी. व्ही. कडागडकाई यांनी विचार मांडले. एनएसएस समन्वयक प्राध्यापक व्ही. व्ही. राजपूत यांनी एनएसएस तसेच एनसीसी उपक्रमांची माहिती दिली.
संस्थेतील सर्व विभागांच्या प्रमुखांनी ऑनलाईन पद्धतीद्वारे सर्व विभागांशी कशाप्रकारे संबंध साधावा, यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पेले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दिशानिर्देशांनुसार या कार्यक्रमाचे युटय़ुबवर थेट प्रसारण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थिनी मेघना कुलकर्णी यांच्या शास्त्राrय गायनाद्वारे झाला. डीन-अकॅडमिक्स डॉ. एम. एस. पाटील, प्रा. एस. पी. देशपांडे, डीन-स्टुडंट अफेअर्स प्रा. एस. पी. देशपांडे यांनी कार्यक्रमात भाग घेतला होता.