वार्ताहर/ केपे
राज्य सरकारने जाहीर केलेल्या चार दिवसांच्या लॉकडाऊनला केपेत दुसऱया दिवशी बाजार क्षेत्रात पूर्ण पाठिबा मिळाला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. केपेत काही दिवसांपूर्वी पालिका निवडणुका झाल्या होत्या. उमेदवार व समर्थकांकडून लोकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या होत्या. यातून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार पालिका निवडणुकीनंतर झपाटय़ाने कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत.
कोरोनाचा फैलावू वाढू नये म्हणून सरकारने जो लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे त्याचे केपेवासियांनी स्वागत करून पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. दुसऱया दिवशीही बाजार क्षेत्रात मासळीविक्री, फळांची विक्री व इतर दुकाने बंद असल्याचे दिसून आले. फक्त किराणामालाची दुकाने, भाज्यांची दुकाने चालू होती. त्याचबरोबर काही हॉटेल्स होम डिलिव्हरी पद्धतीने सुरू होती.
केपे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारितील कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांत बरीच वाढ झालेली असून 328 इतके सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सर्वांत जास्त रुग्ण हे आंबावलीत 40, तर केपे येथे 35 व पारोडा येथे 30 इतके रुग्ण आहेत. तसेच शिरवईत 15, रिवण 10, मळकर्णेत 10, कोठंबी 13 असे रुग्ण असून त्याचबरोबर मायणा, तिळामळ या परिसरांतही रुग्ण सापडले आहेत.
यासंदर्भात राजेश नाईक यांनी बोलताना सांगितले की, सरकारने जो लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. मात्र चार दिवसांपुरता न करता किमान 15 दिवसांचा तरी कठोर लॉकडाऊन लागू करावा. आताच्या लॉकडाऊनमध्ये लोकांना काही सवलती दिलेल्या असून लोक त्यांचा गैरफायदाही उठवत आहेत. गरजेच्या, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱया वस्तूंची दुकाने तेवढी खुली ठेवावीत.