नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असून मागील सलग सहा दिवसांपासून देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकंदर रुग्णांपैकी रविवारी केरळमध्ये सर्वाधिक 20 हजार 728 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मं त्रालयाने सोमवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात 40 हजार 134 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 422 रुग्णांनी जीव गमावला आहे. याचदरम्यान देशभरात रविवारी 36 हजार 946 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून कोरोनाची लागण झालेल्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत केरळमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सलग सहाव्या दिवशी केरळमध्ये 20 हजारांहून अधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये 20,728 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या वाढून 34,11,489 वर पोहोचली असून सध्या 1 लाख 67 हजार 891 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. केरळपाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून रविवारी 6,479 इतके नवे रुग्ण सापडले होते.
देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 95 हजार 958 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 4 लाख 24 हजार 773 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 3 कोटी 8 लाख 57 हजार 467 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच देशात अजूनही 4 लाख 13 हजार 718 इतके सक्रिय रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.