निपाह विषाणूची बाधा झालेल्या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू – कोरोनापाठोपाठ आता चिंतेत आणखी भर
कोझिकोड / वृत्तसंस्था
केरळमध्ये कोरोनाचा उदेक झालेला असतानाच आता निपाह विषाणुमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. निपाह व्हायरसने चिंता वाढवली असून, केरळातील कोझिकोडमध्ये एका 12 वषीय मुलाचा निपाहचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. या मुलावर कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील ‘एनआयव्ही’ने (नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिटय़ूट) या मुलाला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले होते. केरळमधून आलेले नमुने निपाह पॉझिटिव्ह आले असल्याचे प्रयोगशाळेने म्हटले आहे.
ओनमनंतर केरळात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या केरळात आढळत असून, त्यातच आता निपाह व्हायरसचा संसर्ग होऊन एका मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. निपाहने बळी गेलेल्या मुलाला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र पुन्हा त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली. सद्यस्थितीत निपाहबाबत घाबरण्याची गरज नसली तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या, मुलाच्या कुटुंबातील आणि इतर नातेवाईकांपैकी कोणालाही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असेही स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारकडून सतर्कता मोहीम
निपाह विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने मंत्र्यांसह अधिकाऱयांची शनिवारी बैठक झाली होती. या बैठकीत एक समिती गठीत करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, निपाह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम व इतर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मागील 12 दिवसात संपर्कात आलेल्या नागरिकांचे टेसिंग केले जात आहे. त्याचबरोबर क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
निपाहची लक्षणे
कोझिकोडमध्ये 19 मे 2018 रोजी पहिल्यांदा निपाहचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर केरळमध्ये निपाह विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
केंद्रीय पथक दाखल
निपाहने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’चे एक पथक केरळला पाठवले आहे. हे पथक रविवारीच केरळमध्ये दाखल झाले असून ते राज्य सरकारला मदत करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय पथक आता राज्यातील आरोग्य यंत्रणेला काही मार्गदर्शक सूचना करणार आहे. तसेच एकंदर सर्व परिस्थितीवर नजरही ठेवणार असून तांत्रिक समस्या सोडविण्याचाही प्रयत्न करणार आहे.