कॉन्टॅक्ट टेसिंग, लसीकरण वाढवा ः केंद्रीय गृह मंत्रालयाची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे पुन्हा एकदा निर्बंधांचा सामना करावा लागण्याचे संकेत मिळत आहेत. नव्या बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. देशात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून गेल्या सलग दोन दिवसात चाळीस हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण वाढत असून दोन्ही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू जारी करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन्ही राज्यांना दिला आहे.
केरळ आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सध्या कोरोनाची स्थिती बिघडलेली आहे. सध्या या दोन्ही राज्यांची सरकारे निर्बंध वाढवण्यासाठी आढावा घेत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयानेही या दोन्ही राज्यांवर विशेष नजर ठेवली आहे. दोन्ही राज्यांमधील स्थितीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांनी जास्त कोविड-19 रुग्ण सापडणाऱया भागांमध्ये सध्या पहिल्या टप्प्यात नाईट कर्फ्यू जारी करण्याची सूचना केली आहे.
गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांसोबत बैठक घेतल्यानंतर नुकतेच एक निवेदन जारी केले. कोरोना संसर्गातील वाढ थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या भागात जास्त प्रकरणे येत आहेत, तेथे नाईट कर्फ्यूचा विचार केला पाहिजे. याव्यतिरिक्त, कॉन्टॅक्ट टेसिंग, लसीकरण मोहीम तीव्र करणे यासारख्या उपायांनाही वाढवावे लागेल, असे सुचविले आहे. केरळ आणि महाराष्ट्राच्यावतीने मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.
लसींच्या संथ पुरवठय़ामुळे मोहिमेवर मर्यादा
सध्या विविध राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून लसपुरवठा केला जात आहे. तथापि, राज्यांना मुबलक लसपुरवठा होत नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यानुसार गृह मंत्रालयाने या राज्यांना अतिरिक्त लस देण्याचे आश्वासन दिले आहे. लसपुरवठा वाढल्यास मोहिमेला गती आल्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. देशात आतापर्यंत कोविड लसीचे 61 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशातील अर्ध्याहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.
केरळमध्ये सर्वाधिक वेगाने रुग्णवाढ
ऑगस्टच्या मध्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. केरळमध्ये गेल्या एका आठवडय़ापासून नवीन रुग्णांची वाढती संख्या समोर येत आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण केरळमध्येच सापडत आहेत. त्याचबरोबर, केरळनंतर जास्तीत जास्त प्रकरणे महाराष्ट्रातून येत आहेत. शुक्रवारीही देशात 44 हजार 658 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यात 30 हजार रुग्ण केरळमधील आहेत.