प्रतिनिधी/ रत्नागिरी
परतीच्या वादळी पावसाचा जोर ओसरून तीन दिवस उलटले असताना हवामान विभागाने पुन्हा राज्यभरात सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने सोमवार 19 ते 22 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी संपूर्ण कोकण किनारपट्टीसह राज्यात सर्वदूर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. सलग आठवडाभर सोसाटय़ाचा वारा, ढगांच्या गडगडाटाससह विजांच्या लखलखाटात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसला. ऐन कापणीच्या हंगामात ओढवलेल्या या अस्मानी संकटाने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावरून पच्छिमेकडे अरबी समुद्राकडे सरकल्याने कोकण किनारपट्टीवर अलर्ट देण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्हय़ात गेल्या आठवडय़ात पाच दिवस पावसाने धुडगूस घातला. त्यामुळे अनेकांची हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली. पावसाचा जोर शनिवारी ओसरल्याने शेतकरी पुन्हा कापणीच्या कामात गुंतला. मात्र याला तीन दिवस उलटतात तोच पुढील 4 दिवसात कोकणासह राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचे 19, ते 22 ऑक्टोबर या काळात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.