प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे बहिरेश्वर बंधाऱ्याचा पिलर तुटल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस जेसीबीच्या साह्याने उकरून हा मार्ग बंद केला आहे. वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस दिशादर्शक फलक लावलेले आहे. हा मार्ग बंद करण्यात आला असला तरी दुसऱ्या मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.
बहिरेश्वरला जाण्यासाठी कोगे येथून महे, बीड, बीड शेड या मार्गाने व कुडित्रे फॅक्टरी, सांगरूळ, म्हारुळ या मार्गाने जाण्याची सोय आहे. बंधारा मार्गावरून जबरदस्तीने कोणी प्रवास केल्यास व अनुचित प्रकार घडल्यास त्यास सदर व्यक्ती स्वतः जबाबदार असेल याची नोंद घ्यावी अशी सुचनाही ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र हा मार्ग बंद झाल्याने वाहतूकदारांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे.
तरुण भारतमध्ये सहा महिन्यापूर्वीच या धोकादायक पुलाचे वृत्त प्रसिध्द करुन आवाज उठवण्यात आला होता. दसऱ्यानंतर कुंभी-कासारी साखर कारखाना, दालमिया साखर कारखाना यांचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. याच पुलावर या कारखान्यांची ऊस वाहतूक सुरु असते. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.