वारणानगर / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील भाटशिरगांव ता. शिराळा हरिणाम सप्ताहातील प्रवचनाचा कार्यक्रम संपवून परतत असताना कुंडलवाडी -ऐतवडे खुर्व ता. वाळवा दरम्यानच्या ओढ्यावर दुचाकी घसरल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कोरेगांव परिसरातील (ता. वाळवा) प्रसिध्द वारकरी ह.भ.प. प्रल्हाद शंकर पाटील वय ७३ यांचे शुक्रवार दि. ३१ रोजी रात्री निधन झाले असून त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रल्हाद पाटील हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात क्लार्क म्हणून सेवेत होते त्यानी विज मंडळाच्या मलकापूर ता. शाहूवाडी, कोडोली ता. पन्हाळा, इंचलकरजी, वडगांव ता. हातकंणगले या कार्यालयात सेवा बजावली होती मार्च ९८ मध्ये सेवानिवृत्त झाले पासून मार्च १९ ते आज अखेर त्यानी वारकरी सांपदायात पारायणात वाचक म्हणून सेवा केली.
भगवद्गीतेवर यथार्थदीपिका हा टिकात्मक ग्रंथ लिहिणारे संत कवी वामन पंडित यांची प्रेरणा व कोरेगांवचे सुपूत्र संत साहित्याचे अभ्यासक भागवत संप्रदायाचे किर्तन व प्रवचनकार आचार्य ह.भ.प. कृष्णानंद शास्त्री याच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद पाटील यानी १oo१ वेळा ज्ञानेश्वरी वाचन पारायणाचा संकल्प सन मार्च १९९८ ते मार्च २०१९ आजअखेर या दोनच दशकांमध्ये पूर्ण करून वारकरी तसेच आजच्या तरुणांपुढे नवा आदर्श प्रल्हाद पाटील यानी ठेवला होता. सहस्त्र ज्ञानेश्वर पारायण संकल्पपूर्ती निमीत्त त्यांचा ग्रामस्थानी भव्य सत्कार दि. १० मे र०१९ रोजी श्री. नारायण मंदीरातील पारायण सोहळ्यात केला होता. कोरेगांव व परिसरातील गावात हरिनाम सप्ताहा निमीत्त आयोजीत पारायणात ते वाचक म्हणून उपस्थित असत त्याच्या निधनामुळे वारकरी सांप्रदायातील सच्चा भक्त हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पक्षात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.