संपूर्ण राज्य कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची भीती प्रयत्न करुनही आटोक्यात येईना कोरोना
प्रतिनिधी / पणजी
सरकारच्या सर्व प्रयत्नांना ’हळद’ लावत कोरोना रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करू लागला असून संपूर्ण राज्यच या संसर्गाच्या जहरी विळख्यात सापडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच आठवडय़ात दि. 21 आणि दि. 24 या दोन्ही दिवशी प्रत्येकी दीड हजार पार करणारी विक्रमी संख्या गाठल्यामुळे लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. परंतु काल रविवार दि. 25 रोजी कोरोनाने स्वतःचेच विक्रम मोडीत काढताना तब्बल 2293 जणांना संसर्गबाधित केल्यामुळे लोकांचे आश्चर्य आता भीतीत परावर्तीत झाले आहे. त्याचबरोबर 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्याही हजाराच्या पार गेली असून एकूण संख्या 1017 एवढी झाली आहे. तसेच सक्रीय रुग्णांच्या संख्येनेही 13 हजारांचा आकडा पार केला आहे.
हे एकूण चित्र पाहता लॉकडाऊन टाळण्याचे आणि लोकांना दिलासा देण्याचे सरकारने कितीही प्रयत्न केले तरीही राज्याची वाटचाल ल़ॉकडाऊनच्याच दिशेने चालली असल्याचे स्पष्ट होत आहे. आता केवळ सरकारच्या निर्णयाची वाट पाहणे एवढेच लोकांच्या नशिबी राहिले आहे. कोरोनाचा हा वाढता आलेख थरकाप उडवणारा असून केवळ रात्रीची संचारबंदी लावून काहीच फायदा होणार नाही, असेच दिसून येत आहे. दिवसभर कोणतीही बंधने नसल्यामुळे संसर्ग वाढताना दिसत असून लॉकडाऊन पर्यायाचा विचार करण्याची वेळ ठेपली असल्याचे दिसत आहे.
लोकाप्रतिनिधींना एसओपी लागत नाही काय?
एका बाजूने कोरोनाचा विळखा राज्याला अधिकाधिक आवळत आहे. रोज हजारो लोक बाधित होत आहेत, तर दुसऱया बाजूने जनतेला एसओपी पाळण्याचे सल्ले देणारे आणि कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करणारे मंत्र्यांसारखे जबाबदार लोकप्रतिनिधीच या एसओपीला ’हळद’ लावत हळदी समारंभात नाचत असतानाचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत जनतेच्या मनातील कोरोनासंबंधी गांभीर्य आणि भीती संपुष्टात न आली तरच नवल. त्यामुळेच लोक सरकारचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. परिणामी कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून रुग्ण व बळींचा आलेख वाढतच चालला आहे. हे चित्र असेच राहिल्यास येत्या दिवसात आणखीही भयावह स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
बरे होण्याचे प्रमाणही चिंताजनक घसरले
गेल्या वर्षीपासून आतापर्यंत एकूण 77477 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 62771 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रचंड गतीने घटत असून सध्या ते 81.02 टक्क्यांवर आले आहे. गत 24 तासात 135 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहेत तर 547 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांतील रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली असून 1236 रुग्णांसह मडगाव केंद्र आघाडीवर आहे. त्या खालोखाल कांदोळी केंद्रात 1208 तर पर्वरीत 1157 रुग्ण आहेत. पणजी केंद्रात 883, फोंडा 772, म्हापसा 753, वास्को 711, कासावलीत 466, शिवोलीत 451, सांखळीत 417 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या कासारवर्णे या एकमेव केंद्रात दुहेरी संख्येने म्हणजेच 71 रुग्ण आहेत. मडगाव, कांदोळी, पर्वरी या केंद्रात चार अंकी तर अन्यत्र तीन अंकी संख्येने रुग्ण आहेत. गत 24 तासात गेलेल्या 24 बळींपैकी 17 जणांचा मृत्यू गोमेकॉत तर 7 जणांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात प्राण सोडले आहेत. त्यात एका 25 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.