रोजचा सक्रीय रुग्णांचा आकडा शंभरीकडे : एकूण मृतांची संख्या 811
प्रतिनिधी / पणजी
राज्यात गत चार दिवसांपासून एक-एक कोरोना बळीची भर पडत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी तब्बल चार रुग्णांचे बळी गेले आहेत. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 811 वर पोहोचली आहे. त्याशिवाय मंगळवारी 94 रुग्णांची भर पडली व सक्रीय रुग्णसंख्या 792 झाली आहे. याच 24 तासात 73 जण रोगमुक्तही झाले आहेत.
आतापर्यंत एकूण 56100 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 54497 जण बरे झाले आहेत. संशयित रुग्ण म्हणून 11 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 66 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
पणजी, मडगावात संख्या वाढतीच
सध्या विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक रुग्णसंख्येची परंपरा पणजी व मडगाव केंद्रात कायम आहे. पणजीत 105 तर मडगावात 103 रुग्ण आहेत. फोंडा केंद्रात 57, म्हापसात 56, वास्कोत 52, कासावलीत 51 व चिंबलमध्ये 44 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र 40 पेक्षा कमी रुग्ण आहेत.
सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 21, सांखळी 13, पेडणे 12, वाळपई 05, म्हापसा 56, पणजी 105, हळदोणा 06, बेतकी 07, कांदोळी 30, कासारवर्णे 02, कोलवाळ 05, खोर्ली 21, चिंबल 44, शिवोली 11, पर्वरी 33, मये 05, कुडचडे 10, काणकोण 05, मडगाव 103, वास्को 52, बाळ्ळी 04, कासावली 51, चिंचिणी 27, कुठ्ठाळी 34, कुडतरी 08, लोटली 14, मडकई 04, केपे 05, सांगे 04, शिरोडा 07, धारबांदोडा 12, फोंडा 57, नावेली 15. त्याशिवाय हवाईमार्गे आलेले 04 प्रवाशी बाधित सापडले आहेत.
- 16 मार्चपर्यंतचे एकूण रुग्ण 56100
- 16 मार्चपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 54497
- 16 मार्चपर्यंतचे सक्रिय रुग्ण 792
- 16 मार्चरोजीचे नवे रुग्ण 94
- 16 मार्च रोजी बरे झालेले रुग्ण 73
- 16 मार्च रोजीचे बळी 04 आतापर्यंतचे एकूण बळी 811
कोरोना एसओपीबाबत सरकार किंमत देत नाही : खुद्द आरोग्यमंत्री राणेंचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र आणि कर्नाटक या गोव्याशेजारील दोन्ही राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गोव्यात येणारे प्रवासी, पर्यटक यांच्यासाठी कडक एसओपीचे पालन करावे, अशी मागणी करणाऱया प्रस्तावाची फाईल राज्य सरकारकडे पाठवली आहे. मात्र त्याला कोणी किमत देत नसल्याचे निवेदन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोव्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. राज्यात बाहेरून लोक मोठय़ा प्रमाणात येत असून त्यांच्यावर कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे गोव्यात कोरोनाची प्रकरणे वाढण्याचा धोका आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले असून त्यावर कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. गोव्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत असून त्यांची तपासणी होत नाही व त्यांच्यावर कोणतीही एसओपी पाळण्याचे बंधन नाही. कोरोनाचा धोका जर गोव्यात रोखायचा असेल तर कडक एसओपीचे पालन गरजेचे आहे, असे मत त्यांनी प्रकट केले आहे.
गोव्यातील आर्थिक व्यवहार टिकवायचे आहेत आणि ते झाले पाहिजेत या सर्व गोष्टी मान्य आहेत. कोरोनाचे संकट नियंत्रणात ठेवायचे असेल आणि त्याचा प्रवाभ रोखायचा असेल तर सर्वांनी एसओपीचे पालन करायला हवे, तरच ते शक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.