कोरोनाच्या या काळात प्रत्येकालाच अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. ताणतणाव, वैवाहिक जीवनातील मतभेद, बेरोजगारी, वेतनकपात यांसारख्या अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. अर्थात समस्या म्हटल्या की त्यावर उपायही असतात. वाईट काळ सरणार आहे हे नेहमीच डोक्यात ठेवायला हवं. कोरोनामुळे आयुष्यात आलेल्या समस्यांना कसं सामोरं जावं याविषयी…
- वर्क फ्रॉम होम ही संकल्पना कितीही चांगली वाटली तरी यामुळे कामाचे तास वाढले आहेत. कामासाठी दिवसच काय रात्रही कमी पडू लागली आहे. यामुळे चिडचिड, ताण, घरगुती वादांमध्ये भर पडल्याचं दिसून येतं. मात्र वैयक्तिक आयुष्यातील ताणाचा कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. ऑफिसच्या वेळेतच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. रात्रीचं जागरण टाळा. दिवसभरातला थोडा वेळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी राखून ठेवण्यावर भर द्या.
- लॉकडाउनमुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली असली तरी यामुळे वाद वाढत चालल्याचं दिसून येतं. एकमेकांसोबत बराच वेळ घालवणं नकोसं वाटू लागलं आहे. त्यातच घराबाहेर पडणं शक्य नसल्यामुळे घुसमट वाढत चालली आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ देऊ नका. घरच्यांसोबत उगाचच वाद घालू नका. मनःशांतीसाठी योगासनं, मेडिटेशन करा. आवडत्या छंदांना वेळ द्या.
- वेतनकपात, बेरोजगारीचं संकट यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे ताणात भरच पडली आहे. मात्र आर्थिक नियोजन करून तुम्ही ताण कमी करू शकता. अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळा. शक्य तितकी बचत करा. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आप्तांशी चर्चा करा.