अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 28 मे 2021, सकाळी 9.30
● नव्या 2529 रूग्णांची नोंद ● उपचारार्थ रूग्णांनी 25 हजारांचा टप्पा ओलांडला ● सलग दोन दिवसात 5 हजार 204 रूग्ण वाढले ● सर्वच तालुक्यांना कोरोनाचा विळखा घट्ट ● आज उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री जिल्ह्यात
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोनाची रूग्णवाढ कशी रोखायची? मृत्यूदर कसा थांबवायचा? कडक लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांनी सध्या जिल्हावासिय अस्वस्थ आहेत. जिल्हावासियांची ही अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असतानाच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे सातारा जिल्हा दौरा करत आहेत. आत्तापर्यंत अपवाद वगळता जिल्हावासियांनी कडक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. आज कडक लॉकडाऊनचा चौथा दिवस असून ग्रामिण भागावर आता प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कराड नगरपरिषदेसह अनेक ग्रामपंचायतींनी कठोर पावले उचलत रस्त्यावरून फिरणारांसह कोरोना रूग्णांच्या ‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’ मधील नागरिकांची घरी जाऊन कोरोना चाचणी सुरू केली आहे. मात्र काही केल्या रूग्णवाढ कमी होताना दिसत नाही. यावर आता उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री काय उतारा देतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 2529 रूग्णवाढ झाली असून जिल्ह्यात सध्या उपचारार्थ रूग्णांची संख्या 25 हजार 290 झाली आहे.
सातारा तालुक्यातील मृत्यू 1 हजाराकडे
जिल्ह्यात दररोज 30 ते 40 च्या दरम्यान कोरोना रूग्णांचा दुर्दैवाने मृत्यू होत आहे. सातारा तालुक्याचा मृत्यूचा आकडा गुरूवारी सकाळपर्यंत 997 होता. त्यानंतर कराड, खटाव तालुक्यातील मृत्यूचा आकडा चारशे ते सहाशेच्या आसपास आहेत. फलटण तालुक्यात रूग्णवाढ वेगाने होत असली तरी त्या तुलनेत रूग्णांच्या मृत्यूवर नियंत्रण आहे. जिल्ह्यात एकूण 3562 रूग्णांनी आत्तापर्यंत जीव गमावला आहे.
लसीकरणाचा वेग मंदावलेलाच
जिल्ह्यातील रूग्णवाढ दोन हजाराच्या खाली येत नसताना लसीकरणही मंदावले आहे. लसीकरणासाठी अजुनही जिल्हावासिय हेलपाटे मारतच आहेत. रूग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी वेगाने लसीकरण करायला हवे. त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळवण्यासाठी वाट पहावी लागत आहे तर पहिला डोस घेणारांना ‘आज एवढाच साठा उपलब्ध आहे’ असा फलक लसीकरण केॆद्रावर पाहून मागे फिरावे लागत आहे.
दुसरी लाट संपवा…मग तिसरीच्या चर्चा करा
जिल्ह्यात शुक्रवारी 2529 नवे रूग्ण वाढले अवघ्या दोन दिवसात 5 हजार 204 रूग्ण वाढले आहेत. एका बाजूला दुसरया लाटेच्या विळख्यातून जिल्हाला बाहेर पडता येईना. दुसरी लाट संपायचे नाव घेईना आणि ती संपवण्यासाठी ठोस अशा उपाययोजना होईनात. यातच तिसरी लाट कशी थोपवायची याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिसरी संभाव्य लाट थोपवण्याचे नियोजन तर झालेच पाहिजे पण दुसरी लाट एवढ्या वेगाने येईल याचा मागमुसही पहिली लाट संपताना प्रशासनाला आणि जिल्हावासियांना नव्हता. त्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर आटोक्यात आले तरी सातारा जिल्ह्यात दुसरी लाट अजूनही वाढतेच आहे.
गुरूवारी जिल्हय़ात एकूण बाधित 2529, एकूण मुक्त 1127, एकूण बळी 33
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने -737795, एकूण बाधित – 160555, घरी सोडलेले -132990, मृत्यू -3562 उपचारार्थ रुग्ण-25290