प्रतिनिधी/ पणजी
राज्यात दरवर्षी गणेशचतुर्थी उत्सवात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत होती. त्याचबरोबर राज्यातील प्रमुख मार्केटसह ग्रामीण भागातील व्यावसायिकही मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल करीत होते, मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटाने चतुर्थी काळातील उलाढाल प्रचंड प्रमाणात कमी झाली. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार दरवर्षीच्या मानाने यंदा 30 टक्केही उलाढाल होऊ शकली नाही. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चतुर्थी, दिपावलीच्या काळात राज्यात प्रमुख मार्केटमधून प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होते. अनेक मोठे व्यापारी या काळात लाखो रुपयांची उलाढाल करतात. चतुर्थीकाळात दहा ते पंधरा दिवस अगोदर मार्केट परिसर गजबजून जातो. लोक मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. परराज्यातून मोठय़ा प्रमाणात साहित्याची आवक केली जाते. या साहित्याने बाजार फुलतात. गोवाभरातील मार्केटमधून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते, मात्र यंदा कोरोनाच्या संकटाने व्यावसायिकांना संकटात टाकले. त्यामुळे राज्यातील आर्थिक उलाढाल अल्प झालेली आहे.
कपडे, सजावट, मिठाई, फटाक्यांकडे पाठ
गणेशचतुर्थी काळात कडधान्यापासून नवीन कपडे, सजावट साहित्य, विद्युत रोषणाईचे साहित्य, मिठाई, फटाके अन्य दारुकामाचे साहित्य रंगरंगोटीचे साहित्य यावर मोठी उलाढाल होते. घराच्या रंगरंगोटीपासून विविध प्रकारचे सजावट साहित्य खरेदी केली जाते. कपडय़ांच्या खरेदीवर तर मोठी उलाढाल होते. मिठाई खरेदीही केली जाते. फटाक्यांच्या आणि दारुकामाच्या साहित्यावरही लाखो रुपयांची उलाढाल होते. त्याचबरोबर वाहन, किंवा टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिनसारख्या घरगुती वापराच्या वस्तूंचीही मोठय़ा प्रमाणा खरेदी व्हायची. पण यंदा कोरोनामुळे लोकांमध्ये पूर्ण नैराश्य दिसून आले.
अनेकांच्या हाती पैसा नसल्याने विवंचना
कोरोनाच्या मानसिक त्रासाबरोबरच अनेकांच्या नोकऱया गेल्याने, काही अर्धपगारी ठेवल्याने, व्यवसाय थंडावल्याने अनेकांच्या हाती पैसा नसल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. फार मोठा उत्साह नसल्याने लोकांनी रंगरंगोटी, सजावट, कपडे खरेदी याकडे पूर्ण पाठ फिरवली. दारुकामाच्या साहित्यालाही यंदा मागणी नव्हती. त्यामुळे यावर्षी चतुर्थीच्या खरेदीवरील उलाढाल मोठय़ा प्रमाणात थांबली. अगोदरच लोकांना आर्थिक टंचाई होती. त्यात कोरोनाचे संकट यामुळे लोकांनाही अवास्तव खरेदी टाळली. मात्र यामुळे यंदा व्यापाऱयांचे प्रचंड मोठे नुकसा झाले.