आपण प्रगतीपथावर असलेल्या देशाचे नागरिक आहोत, मला जगायचे आहे, माझ्या देशबांधवांनाही जगवायचे आहे, या भावनेने गोव्यासह सर्वांनी कोरोना महामारीला सामोरे जाण्याची गरज वाटते.
आरोग्यक्षेत्रातील सर्वजण, समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते गेले वर्षभर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. कोरोनाच्या दुसऱया प्रहारात गोव्यासह देशभरातील व्यवस्था कोलमडून पडलेली आहे. गोव्यात दरदिवशी दोन ते तीन हजार नवे बाधित सापडत असून प्रतिदिन 40 ते 55 जणांचे बळी जात आहेत. रुग्णांसाठी खाटांचा मोठय़ा प्रमाणात अभाव आहे. ऑक्सिजनाचाही तुटवडा भासत आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारात रुग्ण दगावण्याच्या घटनाही आहेत. या भीषण वास्तवाने सर्वांनाच घायाळ करून सोडले आहे. प्रत्येक व्यवस्था तोकडी पडत आहे. अशातही सरकारी यंत्रणेकडून बेफिकिरीचे प्रदर्शन घडत असल्याने जनतेत संताप व्यक्त होणे साहजिकच आहे.
‘भिवपाची गरज ना’ असे सरकार सांगत राहिले आणि बघता बघता कोरोनाने संपूर्ण गोव्याला विळखा घातला. किती दुर्दैव आहे पहा, देशात बऱयाच बाबतीत ‘नंबर वन’ असलेला गोवा कोरोना संक्रमणात आणि बळी जाण्यातही नंबर वन बनला आहे. हे गोव्याचे अपयश आहे. प्रशासनाच्या अंगवळणी पडलेल्या गलथानपणाने तर या महामारीच्या काळातही कळसच गाठलेला आहे. अशा या आणिबाणीच्या काळात अनेक राजकारणी, व्यापारी, हॉस्पिटलांची गल्लाभरू वृत्ती बळावलेली आहे. कोणाचे नियंत्रण कोणावरच नाही. पण हे किती दिवस चालायचे? गोव्यात सैन्याला पाचारण करण्याची वेळ येऊ नये.
राजकीय विरोधकांच्या भूमिकेप्रमाणे वाटते की महामारी व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी केवळ सरकारवर आहे, पण ते योग्य नाही. जनतेची, लोकप्रतिनिधींची, समाजसेवकांची, समाजसेवी संघटनांचीही जबाबदारी आहे. प्रत्येकानेच सामाजिक कर्तव्य भावनेने स्वतःला जे शक्य आहे ती मदत करायला हवी. कोणाला दोष देत बसण्याची, कोणाची उणीदुणी काढण्याची ही वेळ नव्हे. मात्र कोरोना व्यवस्थापन यंत्रणा कुठे कमकुवत ठरत असेल, कुणी आपले काम योग्यपणे बजावत नसेल, औषधे किंवा अन्य आरोग्य उपकरणांची, मनुष्यबळाची कमतरता भासत असेल तर तातडीने भरुन काढण्याची जबाबदारी संपूर्ण प्रशासन, सरकारची आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री काही अधिकारी, काही कर्मचारीच कर्तव्यात-जबाबदारीत सक्रिय असून चालणार नाही, तर सर्वांनी सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे.
कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर्स, नर्सना ज्या सुविधा आवश्यक आहेत, त्या मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन अप्रिय घटना घडू लागल्या आहेत. आरोग्य खात्यातील अधिकारीवर्ग व सरकार त्याला जबाबदार आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत गोवा सरकारची यंत्रणा, कोरोना महामारीचे व्यवस्थापन चांगले करीत आहे. मात्र गोव्याची तुलना जेव्हा गोव्याशीच होते, तेव्हा ही यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचा स्पष्ट निष्कर्ष निघत आहे. त्यामुळे सरकारने आता कोरोना व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना, आमदारांना कामाला लावले पाहिजे. त्यांना त्यांनी घेतलेल्या पदाच्या शपथेची आठवण करून द्यायला हवी. आरोग्य खात्यातील डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रचंड ताण वाढलेला आहे. रुग्णांचे जीव वाचविण्याच्या कामाबरोबरच लसीकरणाचेही काम त्यांनाच करावे लागत आहे. लसीकरणाच्या कामात सहाय करण्यासाठी अन्य खात्यातील कर्मचाऱयांना सामावून घेऊन आरोग्य खात्यावरील ताण कमी करता येईल. रिकामटेकडे लोक फेसबुक वगैरे सोशल मीडियावरून कितीही टीका करत असले, सल्ले देत असले आणि राजकीय विरोधक संपूर्ण लॉकडाऊनची मागणी करत असले तरी संपूर्ण लॉकडाऊन हा रामबाण उपाय नाही. त्यातून कोरोनावर नियंत्रण मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, उलट होणारे नुकसान भरून येण्यास किती वेळ लागेल, कोण अर्थतज्ञही सांगू शकलेला नाही. आंशिक लॉकडाऊन म्हणजे अर्थव्यवस्थेला जबरी फटका बसू न देता कोराना नियंत्रणात आणण्याचा चांगला उपाय असल्याचे जगभरात सिद्ध झाले आहे. डब्ल्यूएचओ, युएनओनेही हे मान्य केले आहे.
गोव्यात जो झपाटय़ाने फैलाव सुरू आहे, त्यावर मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मिळविण्यासाठी अगोदर जिथे शक्य तिथे कोविड रुग्ण निगा केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या अशा केंद्रांची कोटय़वधीची सामुग्री गेली कुठे? एका घरात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यास त्याला निगा केंद्रात ठेवल्यानंतर किमान 14 दिवस तो तिथे राहतो, उपचारही व्यवस्थित होतात. घरातील अन्य सदस्य बाधित होण्याची शक्यता फारच कमी होते. सध्या घरात एक बाधित सापडला तर त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत असल्याने घरातील अन्य सदस्यही बाधित होतात. इथून सुरू झाली गोव्याची प्रचंड वाढती बाधितांची संख्या. चाचणी अहवाल येण्यास अनेक दिवस लागत असल्याने तोपर्यंत असे लोक सर्वत्र फिरत राहतात. हे कोरोनावाहक फैलावाचे दुसरे कारण आहे. बाहेरून येणारे प्रवासी-पर्यटकांमुळे फैलाव वाढत नाही. होम आयसोलेशनमधील बाधितांना चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवसांनंतर त्रास होतो, तोपर्यंत वेळ गेलेली असते, म्हणून हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याअगोदर, दाखल करुन अवघ्या तासात बळी जातात, परिणामी रोजची बळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे शक्य तेवढी निगा केंद्र सुरू व्हायला हवीत. आंशिक लॉकडाऊनमुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱयांना आळा बसेल. जीवनावश्यक सेवा, वस्तु दुकाने सुरु ठेवल्यास दैनंदिन जगणे शक्य होईल. अन्य सर्व दुकाने बंद ठेवल्यास अनावश्यक गर्दी टळेल. नोकरी, धंदा सुरू राहिल्यास उदरनिर्वाह होईल. घरी बसून फक्त सरकारी कर्मचाऱयांना पगार मिळतो. ज्यांनी पाच पिढय़ांसाठी पैसा करून ठेवला आहे त्यांना पंधरा दिवसांचेच कशाला कितीही मोठय़ा काळाचे लॉकडाऊन केले तरी काहीही फरक पडणार नाही. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी गरज आहे ती सर्वांनी एकत्र येऊन एकमेकाला मदत करण्याची.
राजू भिकारो नाईक