मगो नेते सुदिन ढवळीकर यांची माहिती
वार्ताहर /मडकई
आजपासून सुरु होणाऱया विधानसभा अधिवेशनात पूरग्रस्त, कोरोनाचे बळी व तौक्ते वादळांतील नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई मिळावी यासाठी त्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले जातील. सरकारला जनतेच्या या प्रश्नांवर उत्तर द्यावेच लागेल, अशी माहिती मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
दोन महिन्यांपूर्वी आलेल्या तौक्ते वादळात अनेकांची घरे जमनीदोस्त झाली. या नुकसानग्रस्तांना केवळ दीड हजार रुपये देऊन सरकारने त्यांची थट्टा केली आहे. त्यांना किमान 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळायला हवी होती. या वादळात बागायतदारांचीही मोठी हानी झाली असून त्याचीही सरकारने योग्य दखल घेतलेली नाही. त्यांचे हे प्रश्न अधिवेशनात मांडले जातील.
नुकत्याच आलेल्या महापुराच्यावेळी नदी काठावर वसलेल्या गावांना पूर्व कल्पना देऊन पाणी सोडले असते, तर अनेकांना वेळीच आपले सामान आवरता आले असते. सरकारच्या या निष्काळजीपणामुळे आज अनेक लोकांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. पूरग्रस्तांच्या नुकसानीचा अंदाजही मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थीतपणे केलेला नाही. महापुरात रु. 500 कोटींची नुकसानी झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा अत्यंत खोटा आहे. ही नुकसानी त्याहून कितीतरी अधिक आहे. सरकारची आपत्कालीन मदतयंत्रणा पूरग्रस्तांना मदत करण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही ढवळीकर यांनी केला. पाणी सोडून जनतेच्या आयुष्याशी खेळणाऱया मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्याव व या आपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कुठलेच नियोजन नसताना ऑनलाईन शिक्षण पद्धती लागू करुन मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱया सरकारला या मुद्दय़ावरही विधानसभेत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुवे बगल रस्ता, नावेली, आर्लेम या रस्त्यांचा प्रश्नही उपस्थित केला जाणार आहे. मुंबईतील गोवा सदन गेली नऊ वर्षे बंद आहे. अनेक गोमंतकीय मुंबईत टाटा किंवा अन्य इस्पितळात उपचारासाठी जातात. त्यांना गोवा सदन खूप उपयोगी पडत होते. मुंबईतील हे गोवा सदर पुन्हा खुले करावे अशी मागणीही केली जाणार आहे. केंद्रात भाजपाचे सरकार असूनही गोव्यात नवीन वाहतूक कायद्याची अंमलबजाणी का होत नाही ? सन 2019 साली लागू होणाऱया या कायद्याची अंमलबजावणी 2022 सालापर्यंत पुडे नेणाचा मंत्रीमंडळाच्या निर्णयाला आपला आक्षेप असून हा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित केला जाणार आहे.
शापूर-बांदोडा येथील सफा मशीदची तटबंदी कोसळल्यानंतर आपण भारतीय पुरातत्त्व खात्याशी लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. जुने गोवे येथे पुरातत्त्व खात्याची शाखा आहे. या ऐतिहासिक वास्तुचे जतन होणे गरजेचे असून तसे आपण अधिकाऱयांना कळविले आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
पूरात जमिनदोस्त झालेली नऊ घरे उभारणार
नुकत्याच आलेल्या महापुरात कोसळलेल्या घरांपैकी अत्यंत आवश्यक असलेली नऊ घरे आपण स्वतः उभारुन देणार आहे. त्यासाठी प्रथम पाहणी केली जाईल व नंतर माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे सावईवेरे भागत 3, खांडेपार येथे 3 अशी एकूण नऊ बांधली जातील. याशिवाय अन्य मदत लागल्यास ट्रस्टतर्फे पुरविण्यात येणारअसल्याचे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.