– गतवर्षीच्या तुलनेत मार्च ते जुलै दरम्यान शहरातील मृत्यू संख्या कमी
नंदकुमार तेली /कोल्हापूर
कोरोना महामारीच्या काळात शहरातील मृत्यूच्या प्रमाणात वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, गतवर्षातील (मार्च ते जूलै – 2019) या काळातील मृत्यू दराची तुलना करता यावर्षातील (मार्च ते जूलै 2020) या पाच महिन्यांच्या कालावधीत मृत्यू दरात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या पाच महिन्यात मृत्यू दरात 430 ने घट
जिह्याला कोरोनाचा विळखा पडला असून पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 10 हजारांवर गेली आहे. आजअखेर 261 जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी (मार्च ते जूलै 2019 मध्ये) गेल्या पाच महिन्यात शहरातील 3 हजार 125 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी (मार्च ते जूलै 2020 मध्ये) 2 हजार 725 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर सुमारे 4 हजार 121 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच गेल्या पाच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शहरातील मृत्यू दरात 430 ने घट झाली आहे. अशी माहिती महापालिका जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचे अधिकारी संजय कुंभार यांनी दिली.
कोरोनामुळे नागरिकांत आरोग्याविषयी जनजागृती
कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी संपूर्ण देशात जनता कफ्यू, लॉकडाऊन लागू केल्याने अपघातासह इतर आजाराने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळाली. तसेच पर्यावरणाचाही समतोल राहिला. नैसर्गिक वातावरण, नागरिकांमध्ये आहार, आरोग्याविषयीची जनजागृती आदींमुळे कोरोना महामारीच्या काळातही मृत्यू दरात घट झाली आहे. असे मनपा जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील मृत्यू दराच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असून प्रतिकारशक्ती कमी असणाऱयांना याचा अधिक धोका आहे. मात्र, वेळ न घालवता तत्काळ तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून घेतल्यामुळे कोरोनावर अनेकांनी मात केली आहे.
2019 व 20 या दोन वर्षातील पाच महिन्यातील मृत्यू नोंदणी अहवाल
माहे सन 2019 सन 2020
मार्च 661 605
एप्रिल 605 490
मे 617 537
जून 616 533
जुलै 623 630
एकुण 3,125 2,795