गेल्या 24 तासात 94 हजार 372 जण बाधित ; 78 हजार 586 जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली
भारताचा कोरोना रिकव्हरी रेट 77.87 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत 47 लाख 54 हजार 356 जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी 37 लाख 2 हजार 595 जण बरे झाले आहेत. भारतात दररोज 70 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होत आहेत. देशात आतापर्यंत 5 कोटी 62 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. शनिवारी एका दिवसात 10 लाख 71 हजार कोरोना चाचण्या झाल्या.
देशातील ज्या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण होते त्या राज्यांमध्येही परिस्थितीत नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. केंद्र सरकारने दिलेली मदत आणि केलेले मार्गदर्शन यामुळे राज्यांना कोरोना संकटाचा मुकाबला करणे शक्मय झाले आहे. सर्वाधिक कोरोनाबाधीत असलेल्या पाचही राज्यांमध्येही कोरोना रिकव्हरी दर वाढत आहे. महाराष्ट्रात दररोज 13 हजारांपेक्षा जास्त तर आंध्र प्रदेशमध्ये दररोज 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होत आहेत.
रुग्ण बरे होत असले तरी नवे रुग्ण येणे थांबलेले नाही. देशात कोरोनामुळे 78 हजार 586 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 9 लाख 73 हजार 175 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. या वातावरणात दिलासा देणारी अजून एक बाब आहे. संपूर्ण जग कोरोनाला प्रतिबंध करू शकेल अशा सक्षम लसीच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहे. सुदैवाने भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन या लसीचे प्रयोग यशस्वी होत आहेत. तसेच आता सिरम लसीच्या चाचणीला लागलेला ब्रेक सुटला असून दोन दिवसातच पुन्हा निरीक्षणे सुरू झाल्याने लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे दृष्टिपथात आली आहेत. लंडनमध्ये प्रयोगात सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाची तब्येत बिघडल्यामुळे चाचणी स्थगित करण्यात आली होती. भारतात सुरू असलेले प्रयोगही डीसीजीआयने स्थगित केले होते.
पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत लसीची प्रतिक्षा
भारत बायोटेक आणि सिरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्यासाठी संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळय़ा टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या 2020 च्या अखेरीस किंवा 2021 च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्मयता आहे.
देशात कोरोनाग्रस्त 47 लाखांच्या पार
देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोजच हजारोंच्या संख्येने वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. कोरोना या भयावह विषाणूने देशात सुमारे 47 लाख लोकांना ग्रासले आहे. तर सुमारे 78 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासात पुन्हा 94 हजार 372 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 47 लाख 54 हजार 356 एवढा झाला आहे. तर उपचारादरम्यान, आत्तापर्यंत सुमारे 78 हजार 586 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत सुमारे 37 लाख 2 हजार 596 जणांनी कोरोनावर मात केली आहे.