नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेले सलग आठ दिवस देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यानंतर मंगळवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांच्या काळात देशात 10 हजार 584 नवे रूग्ण आढळले आहेत. गेल्या चार दिवसांच्या प्रतिदिन रूग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या साधारणतः 4 हजारने कमी आहे. उपचाराधीन रूग्णांच्या संख्येतही घट झाली असून ही संख्या साधारणतः 1 लाख 51 हजारांवरून 1 लाख 47 हजार 396 वर पोहचली आहे. याच 24 तासांच्या कालावधीत 78 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला.
आतापर्यंत 1 कोटी 17 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना रूग्णांची एकंदर संख्या 1 कोटी 10 लाख 16 हजार 434 इतकी असून बरे झालेल्यांची संख्या 1 कोटी 7 लाख 12 हजार 665 आहे. मृतांची एकंदर संख्या 1 लाख 56 हजार 463 इतकी आहे. उपचाराधीन रूग्णांची संख्या एकंदर रूग्णसंख्येच्या 1.34 टक्के इतकी आहे. अद्यापही रूग्णसंख्येत महाराष्ट्रच आघाडीवर असून याखालोखाल केरळचा क्रमांक लागत आहे.
पाच राज्यांमध्ये 87 टक्के रूग्ण
महाराष्ट्र, केरळ, छत्तीसग, राजस्थान आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये नव्या रूग्णांपैकी 87 टक्के रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमधल्या स्थितीवर केंद्र सरकारचे विशेष लक्ष आहे. लसीकरण वाढविणे आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन करणे अनिवार्य करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात काही स्थानी मर्यादित संचारबंदी आहे.
पश्चिम बंगालचे मंत्री कोरोनाग्रस्त
पश्चिम बंगालचे ऊर्जामंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय कोरोनाबाधित झाल्याने त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचा प्राथमिक अहवाल असून त्यांच्यावर आगामी काही दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.