पुणे / प्रतिनिधी :
कोरोना संकटात राज्याचे कृषी आणि पणन खाते पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता किमान सरसकट कृषी कर्ज तरी द्या, अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती चे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
रविवारी खोत यांनी राज्यातील निवडक पत्रकारांशी झूम ॲप द्वारे संवाद साधला. यादरम्यान बोलताना खोत यांनी राज्य सरकार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. खोत म्हणाले, कोरोना संकटात राज्याचे कृषी पणन खाते अपयशी ठरले. आता सहकार खाते ही गप्प बसले आहे. शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पीक कर्जमाफी झाली नाही. पेरणी तोंडावर आली तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. बियाणे, खतांचा पुरेसा पुरवठा नाही. शेतकऱ्यांना चढ्या भावाने खाते खरेदी करावी लागत आहेत. मात्र, शरद पवार गप्प आहेत. कर्ज आणि दीर्घ व मध्यम मुदतीच्या कर्जाचे पुनर्गठन करणे आणि सरसकट सर्व शेतकर्यांना पिक कर्ज देणे हे सहकार खात्याच्या हातात आहे. पण ते काही करत नाहीत. पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात बँकर्सची बैठक घेऊन टार्गेट पूर्ण करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे आरबीआयला कळवले पाहिजे.
साखर कारखाने एफआरपी देत नाहीत. एक वेळेस सध्याच्या स्थितीमुळे असे झाले म्हणता येईल. पण सर्व कारखान्यांनी 85 टक्के बँक उचल घेतली आहे. त्यांना उसाचा भाव देणे अवघड नव्हते. पवारांनी यात लक्ष घातले नाही. माझ्यावर इतर टीका करतील पण सध्याच्या स्थितीत शेतकऱ्याचा दगडाखालचा हात काढून घेण्यासाठी किमान 80 टक्के रक्कम कारखान्यांना सक्तीने द्यायला लावून 20 टक्के रकमेची हमी राज्य शासनाने घ्यायला हरकत नाही. एक्सपोर्ट साठी अडचणी असतील तर केंद्राला बफर स्टॉक करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने द्यायला पाहिजे, तोही केला जात नाही.
मुंबईत महाराष्ट्राच्या संपूर्ण ग्रामीण भागातून मजूर मोठ्या प्रमाणात जाऊन अडकला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर पत्र्याच्या घरांमध्ये या माणसांचे विलगीकरण होणार नाही आणि कोरोना ची स्थिती मुंबईत भडकेल. राज्य सरकार या मजुरांना प्रवास खर्च करून आपल्या गावी पाठवू शकत होते, तेही या सरकारला जमले नाही, अशी टीका खोत यांनी केली.