महत्व द्यायचे कशाला, विधानसभा की गोकुळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत जवळपास सर्वच नेत्यांनी भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मात्र राधानगरी भुदरगडेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी अद्याप जाहीर भूमिका घेतली नाही. गोकुळ आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगळी असल्याने कोणत्या निवडणुकीला महत्व द्यायचे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. विधानसभा महत्वाची की गोकुळला प्राधान्य या धर्मसंकटात ते सापडले आहते. तथापि त्यांना दोन दिवसात कोणतीतरी एक भूमिका घेवून पुढे जावे लागणार असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
गोकुळसाठी जिल्ह्यात वातावरण तापले असताना खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर या शिवसेनेच्या नेत्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही. माने यांना गोकुळमध्ये फारसा रस नसला तरी आबीटकर यांचा निर्णय सत्ताधाऱ्यांसह शाहू आघाडीला महत्वाचा आहे. राज्यात महाविकास आघाडी असल्याने आबीटकर यांनी शाहू आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे असा मतप्रवाह पुढे आला आहे. मात्र स्थानिक राजकारणात महाविकास आघाडी म्हणून आबीटकर यांना फारसा उपयोग होणार नाही. हे ही तितकेच महत्वाचे आहे. राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी हा त्यांचा प्रमुख शत्रू आहे. के. पी. पाटील यांच्याशी त्यांना सामाना करावा लागतो. सध्या के. पी. पाटील. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील शाहू आघाडीत आहेत.
त्यांचे दुसरे प्रतिस्पर्धी बजरंग देसाई गोकुळमध्ये सत्ताधारी आघाडीसोबत आहेत. तर विधानसभा निवडणुकीत आबीटकर यांना आमदार पी. एन. पाटील गटाची अप्रत्यक्ष मदत होते. त्यांना गोकुळपेक्षा विधानसभा महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे. सत्ताधारी गटाचे नेते महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांना थेट दोन जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा असून शाहू आघाडीनेही खुली चर्चा करण्याची तयारी दर्शवलल्याचे वृत्त आहे. दोन दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रा. अर्जून आबीटकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. एका बाजुला महाविकास आघाडीचा दबाव तर दुसऱया बाजुला मतदार संघातील राजकिय जोडणी या धर्मसंकटातून ते कसा मार्ग काढतात याकडे गोकुळ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.