शासकीय हॉस्पिटलचा बेड नाहीत म्हणून तर खासगी हॉस्पिटल्सचा उपचारास नकार, निगेटिव्ह रिपोर्ट आणा, त्यानंतर रूग्ण घेण्याची तयारी, प्रशासनाच्या निर्णयाचा सामान्य रूग्णांना फटका,
शहर, करवीरमधील चौघांचा कोरोनाने मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर
अचानक धाप वाढली म्हणून वाहन शोधून खासगी हॉस्पिटल्समध्ये नेले.. पण प्रत्येक ठिकाणी नकार.. लक्षणांवरून सीपीआर, आयसोलेशनला नेण्याची सुचना.. तेथे नेल्यानंतर बेड फुल्ल व्हेंटिलेटर कमी. पुन्हा रूग्णांचा प्रवास घराकडे पण घरापर्यत जाण्यापुर्वीच अन्य ठिकाणी नेण्यापुर्वीच वणवण केल्यानंतर उपचाराविना मृत्यू चौघांचेही स्वॅब रिपोर्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह…! जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचा असा फटका सामान्य रूग्णांना बसत आहें. या चार कोरोना बळींना जबाबदार कोण, हा प्रश्न. दरम्यान, उपचारास नकारावरून वादावादीच्या घटना वाढत आहेत.
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोना बळींची संख्या शंभरावर गेली. करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील एका व्यापाऱयाचा उपचाराअभावी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. तेथीलच अन्य एकाला सीपीआरमध्ये आणले गेले. आमदारांच्या फोननंतर यंत्रणा हलली. तोपर्यत उशीर झाला होता.. त्याचाही कोरोनाने मृत्यू झाला. व्हेंटिलेटर्स कमी असल्याने हे दोन बळी गेले.
शुक्रवारी सकाळी शहरातील हिरा पार्क आणि रंकाळा टॉवर येथील रूग्णांचाही उपचाराविना मृत्यू झाला. हिरा पार्क येथील 55 वर्षीय महिलेला धाप लागली.. तिच्यासाठी रात्री धडपड करून सिलिंडर आणले. सकाळपर्यत तिला जीवदान मिळाले. त्यानंतर उपचारासाठी तिला आयसोलेशनला नेले. त्यांनी सीपीआरला नेण्यास सांगितले. पण तेथेही बेड फुल्ल.. खासगी रूग्णालयांकडून निगेटिव्हचा रिपोर्ट आणा, त्यानंतर उपचाराची तयारी.. तिचा स्वॅब घेण्यात आला, तिला घरी नेण्यात आले. तिचा दुपारी मृत्यू झाला.
रंकाळा टॉवर परिसरातील मंडप बोळ येथील 61 वर्षीय व्यक्तीला गुरूवारी धापेचा त्रास सुरू झाला. दिवसभरात कुटुंबियांनी उपचारासाठी 15 खासगी हॉस्पिटल्सचे उंबरे झिजवले..एव्हाना रूग्णाची स्थिती गंभीर होत गेली. यातून तणावामुळे संतप्त कुटुंबियांकडून हॉस्पिटलची काच फोडण्याचा प्रयत्न झाला. या रूग्णाचाही स्वॅब घेण्यात आला. त्यालाही अखेरच्या क्षणी उपचारासाठी ना रूग्णवाहिका मिळाली ना शववाहिका..तिचाही उपचाराविना मृत्यू झाला. या दोन्ही व्यक्तींचे स्वॅब त्यांच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले.. या चार कोरोना बळींचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याने खासगी हॉस्पिटल्ससह जिल्हा प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बेडअभावीकोरोनारूग्णांचामृत्यूदुर्दैवी: राजेशक्षीरसागर
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपचाराअभावी कोरोनाने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, सीपीआरमध्ये बेडअभावी दोघा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शासनाने जीवनदायी योजनेंतर्गत असलेल्या खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रूग्णांवर उपचाराचे निर्देश आहेत. तरीही बेडअभावी कोरोना रूग्णांचा मृत्यू होणे ही दुर्दैवी घटना आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. शनिवारी सकाळी 11 वाजता यासंदर्भात सीपीआरमध्ये माजी आमदार क्षीरसागर आढावा बैठक घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.