विनायक पाटील / कुदनूर
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे माणसातील माणुसकी हरवत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचीही चांगलीच हेळसांड होत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. मात्र, डॉ. आप्पासाहेब बामणे यांचे ‘आधार क्लिनिक’ या सर्व बाबींना अपवाद ठरत आहे. किणी कर्यात भागात डॉ. बामणे हे आपली रुग्णसेवा अविरत चालवत असून, कोरोना विषाणूची कसलीच भीती न बाळगता ते सर्वप्रकारच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे किणी कर्यात भागातील रुग्णांना डॉ. बामणे यांच्या ‘आधार क्लिनिक’चा चांगलाच आधार मिळत आहे.
चंदगड तालुक्यात कोरोनाने डोके वर काढले असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. याशिवाय समूह संसर्गही मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यातच हवामानातील होत असलेल्या बदलामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचे रुग्ण अधिक वाढले आहेत. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे अशा रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरही घाबरत आहेत. बरेच डॉक्टर तर रुग्णांना दवाखान्यात न घेता दारातूनच औषधे लिहून देत असून, औषधांद्वारे उपचार घेण्याचा सल्ला देत आहेत. तर तपासणी आवश्यक असणार्या रुग्णांना विविध दवाखान्यांकडे चकरा मागाव्या लागत असल्यामुळे त्यांची एकप्रकारे हेळसांड होत आहे.
नियमित आजारावरील अनेक रुग्ण
किणी कर्यात भागात शर्करा, रक्तदाब याशिवाय नियमित आजार असलेले अनेक रुग्ण आहेत. अशा रुग्णांना नियमित उपचाराची नितांत गरज आहे. याशिवाय रक्त, लघवी यांचीही तपासणी त्यांना नियमित करावी लागते. कोरोनाच्या धास्तीमुळे डॉक्टर अशा रुग्णांकडेही लक्ष देण्याचे टाळत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य – डॉ. आप्पासाहेब बामणे, आधार क्लिनिक (कागणी, कोवाड)
कोरोना विषाणूला भयभित होऊन चालणार नाही. अशा परिस्थितीतही रुग्णसेवा महत्वाची आहे आणि मी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य देत आहे. किणी कर्यात भागातील रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठीही मी प्रयत्न करत आहे.