प्रतिनिधी / वारणा कापशी
गेल्या काही दिवसांपासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये व खाद्यतेलाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. एकीकडे शासन वेगवेगळ्या योजना व सुविधा च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीका पर्यंत गॅस पोहोचवण्याचा व गॅस वर अनुदान देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सततच्या वाढत्या महागाईमुळे या योजनाही कुचकामी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील लोकांचा कल जळावू लाकूड व चुलीकडे वाढलेला आहे.
धुरमुक्त भारत बनवण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबापर्यंत उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काहींना मोफत तर काहींना नाममात्र शुल्कामध्ये गॅस जोडणी करून दिली.
सुरुवातीस नवीन गॅस आल्यामुळे नागरिकांनी त्याचा भरपूर वापर केला. परंतु दिवसेंदिवस गॅससिलेंडरच्या दरात वाढ होत गेली आहे. खाद्य तेलाच्या किंमतीही वाढलेल्या आहेत. खाद्यतेलाचा दर तर 75 रुपयावरून एकशे पस्तीस ते 140 रुपये पर्यंत पोहोचलेला आहे, तर गॅस सिलेंडर ७७०रु वर पोहचला. त्यामुळे उज्वला योजनेतून गॅस जोडणी करणाऱ्या ग्राहकांना गॅसवर स्वयंपाक बणवणे अवघड झाले आहे. गॅस सिलेंडरच्या दरात भरपूर वाढ झालेली आहे. गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करायची सवय लागलेली आहे. परंतु ग्रामीण भागात दरवाढ परवडत नसल्यामुळे लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. काहींनी उज्वला योजनेतून मिळालेल्या गॅस वापर बंद केलेला आहे. आणि ग्रामीण भागातील लोकांचा जळाऊ लाकूड व चुलीकडे जास्त कल वाढलेला आहे.