उशिरा उपचारार्थ दाखल, उपचारास पुरेसा वेळ न मिळाल्याने जिल्ह्यात मृत्यूसंख्येत वाढ, मार्गदर्शक सुचनांकडे दुर्लक्षामुळे होम क्वांरटाईन मधील 32 जणांचा मृत्यू : टास्क फोर्सचा निष्कर्ष , नॉन कोरोना आयसीयु आवश्यकच : टास्क फोर्स
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
देशात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यात झाले. जिल्ह्याचा कोरोना डेथ रेट साडेतीन टक्क्यांवर आहे. दाखल झालेले 43 टक्के मृत्यू हे पहिल्या 72 तासांत झाले. यामागे उशिरा उपचारार्थ येणे अन् उपचारासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याचे कारण आहे. होम क्वांरटाईनमधील 32 जणांचा मृत्यू हा मार्गदर्शक सुचनांकडे दुर्लक्षामुळे झाल्याचा निष्कर्ष विभागीय टास्क फोर्सने अहवालात नोंदवला आहे. सीपीआरमध्ये कोरोनामुक्त झालेल्या नॉन कोरोना रूग्णांसाठी अतिदक्षता विभाग आवश्यकच असल्याचे मतही टास्क फोर्सने नोंदवले आहे.
जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी विभागीय टास्क फोर्सने बुधवारी, 12 मे रोजी सीपीआर, आयजीएम हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी अधिकारी, कर्मचारी, रूग्णांशी झालेल्या चर्चेतून अपुरे मनुष्यबळ हे कारण पुढे आले. टास्क फोर्सने पाहणीनंतर 5 पानी अहवाल नुकताच शासनाला सादर केला. यामध्ये 11 मे पर्यत जिल्ह्यात 11358 सक्रीय रूग्ण आहेत. जानेवारी ते 11 मेपर्यत 1071 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तीन आठवड्यात झपाटÎाने कोरोना मृत्यू वाढल्याने डेथ रेट 3.5 टक्क्यावर गेला. डेथ रेट पाहता 45 टक्के मृत्यू हे सीपीआर, आयजीएम हॉस्पिटलमध्ये झाले आहेत. यामागे उशिरा उपचारार्थ रूग्ण दाखल होणे, उपचारासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याचे कारण आहे. परराज्य, परजिल्ह्यांतून रूग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने कोल्हापुरात आले आहेत.
त्यातील 188 जणांचा मृत्यू जिल्ह्यात आल्यानंतर झाला. कोरोना मृत्यूंपैकी सुमारे 43 टक्के मृत्यू हे पहिल्या 72 तासांत झाले आहेत. हे रूग्ण वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले नाहीत, त्यांची स्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना दाखल करण्यात आले, त्यामुळे योग्य ते उपचार करण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्याने डेथ रेट वाढल्याचा निष्कर्ष टास्क फोर्सने काढला आहे. बरेच रूग्ण गंभीर स्थितीत काही प्रायव्हेट हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातून थेट शासकीय हॉस्पिटलमध्ये आले. अशांवर उशिरा आल्याने उपचार करणे कठीण झाल्याने मृत्यू वाढल्याचे स्पष्टपणे नमुद केले आहे. याशिवाय सर्वच हॉस्पिटलमध्ये अपुरे मनुष्यबळाचे कारणही दर्शवले आहे.
क्वांरटाईन नियमावलीकडे दुर्लक्षामुळे 3 जणांचा मृत्यू
कोरोना केअर सेंटर, होम क्वांरटाईनमधील 32 जणांच्या मृत्यूमागे रूग्णांच्या वेळीच योग्य ती काळजी घेण्याकडे दुर्लक्ष झाले., त्यांना योग्यवेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले नाही. होम क्वांरटाईनमध्ये मार्गदर्शक सुचनांच्या काटेकोर अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्याचा निष्कर्षही नोंदवला आहे.
उशीरा दाखल झाल्याने मृत्यू झालेल्यांची तासनिहाय आकडेवारी
वेळ मृत्यू रूग्णसंख्या टक्केवारी
24 तास 232 21.68
48 तास 122 11.40
72 तास 113 10.56
96 तास 88 8.22
120 तास 84 7.85
120 तांसांच्या पुढे 431 40.28
एकूण 1070 100 टक्के
महिनानिहाय झालेले मृत्यू
महिना झालेले मृत्यू
जानेवारी 11
फेब्रुवारी 22
मार्च 27
एप्रिल 485
मे 11 पर्यत 526
एकूण 1071