सरपंच रुपाली तावडे यांनी दिली माहिती
टोप / वार्ताहर
टोप येथील गट नंबर १२७४ मधील अतिक्रमणे हि न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे कोणीही अतिक्रमणे करु नये. २८ सप्टेंबरला न्यायालयात तारीख आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार असे लोकनियुक्त सरपंच रूपाली तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गावच्या वेताळमाळावर १६ हेक्टर गायरान असून यात ठिकाणी गावातील काही लोकांनी ३० ते ३५ वर्षापूर्वी बांधकाम केले आहेत. आम्ही सन २०१७ साली सत्तेवर आल्या नंतर गेल्या दोन तीन वर्षांत या ठिकाणी एक ही बांधकाम किंवा अतिक्रमण होवू दिलेले नाही. या जागेवर एकूण ५७ लोकांनी रहिवासी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही आणि पूर्वीच्या लोकांनी प्रयत्न केला होता. पोलिस बंदोबस्त ही मागितला होता. पण हे सर्व अतिक्रमण केलेले लोक सन २०१७-१८ ला न्यायालयात गेले. अतिक्रमण धारकांनी न्यायालयात आणि मंत्रालयात दाद मागितली आणि न्यायालयाने, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी मनाई आदेश दिला.
२०१० पूर्वीची बांधकाम कायम करण्याचा आदेश आला असून ग्रामपंचायतीला फाळा आकारणी करण्यासही सांगितले आहे. जयसिंगनगर, गंगारामनगर, धनगर वसाहत या ठिकाणचे अतिक्रमण कायम केले आहे. पाणी, वीज व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीत आहेत. ज्या लोकांनी २०१० नंतर बांधले आहेत. त्यांच्या नोंदी घेतलेल्या नाही. वेताळमाळावर गायरानात बांधकाम करण्यासाठी जे गावातील गवंडी, यंत्रसामुग्री जातील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे फलक ही लावले आहेत. वेळावेळी नोटिसाही बजावल्या आहेत. कारवाई हि केली आहे.
टोप वेताळमाळ वाढीव गावठाणसाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव दिला आहे. ज्यां गरजूंना अडचण आहे,ज्यांच्याकडे जागा नाही. त्यांना जागा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. महामार्ग सहापदरीवेळी ज्यांची घरे रस्त्याच्या कामात जाणार आहेत त्यांना प्राधान्याने जागा देणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरदार आहे. गाव हॉट स्पॉटमध्ये आहे. त्यामुळे गावात उपाय योजना करण्यात सर्व ग्रामपंचायतीची यंत्रणा ही लागली आहे. अशीहि माहिती सरपंच रुपाली तावडे यांनी दिली आहे. मुस्लिम समाज, तेली समाज, गोपाळ समाज, स्मशानभूमी महावितरणसाठी जागा दिली आहे.
या बैठकीला उपसरपंच शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील, रंजना पाटील, अंजना सुतार, माजी सरपंच बाळासाहेब कोळी उपस्थित होते.