पाटगांव / वार्ताहर
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने अनेक भागात गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ऊस भरून वाहतूक होताना चित्र दिसत आहे साखर कारखान्याकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर ट्रॅक्टर सर्व मार्गावर अनाधिकृतपणे दुसरी ट्रॉली लावून क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून सर्रास वाहतूक केली जात आहे. त्यामुळे चढावर ट्रॅक्टरची इंजिन उचलून दोन चाकावर जीवघेणी वाहतूक केली जाते. बेजबाबदारपणे ट्रॅक्टर ट्रॉली वाहतूक करत असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक उसाचा भरणा करून वाहतूक केली जाते. वजनाप्रमाणे ट्रॅक्टर मालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टर चालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात यासाठी सर्रास दोन ट्रॉलीचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता 14 ते 15 टन इतके असते परंतु यामध्ये 18 ते 20 टन ऊस भरला जातो. पण नफा कमविण्यासाठीचा हा प्रकार इतरांसाठी जीवघेणा ठरत आहे.
ऊस वाहतुकीसाठी विना पासिंग ट्रॉलीचा वापर करण्यात येतो ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरत आहे. ट्रॉलीच्या पाठीमागे लाईट, रिफलेक्टर नसल्याने अपघात होत आहेत. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी होत असून रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत आहे तर रस्त्यातच ट्रॉली सोडणे, ट्रॉलीला लावलेले दगड न उचलणे, मोठ्याने टेपरेकॉर्डर लावणे हेही अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असून, यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफलेक्टर लावण्याची सक्ती करावी अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
भुदरगड तालुक्यात तांबाळे, बिद्री, फराळे, सेनापती कापशीसह अन्य कारखान्याची उस वाहतुक सुरु असून, काही ठिकाणी एकरी रस्ता आहे तर काही ठिकाणी रस्ता खराब झाला आहे अश्यात उसाची वहातुक सुरु असल्याने ट्रकचालक, ट्रॅक्टर व अन्य वहानधारकात वाहन खाली घेण्यावरून वादावादी प्रकार घडत आहेत.
जिल्ह्यात सध्या साखर कारखाने सुरू झाले आहे. ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीतून उसाची वाहतूक केली जात आहे. जिल्ह्यात एक हजारहून अधिक ट्रॅक्टरव्दारे उसाची वाहतूक केली जात आहे. उसाची सिंगल ट्रॉली व डबल ट्रॉलीतून उसाची वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करताना लाईटचा वापर करताना ट्रॅक्टर चालकांकडून हयगय केली जात असल्याचे पहायला मिळत आहे.
अनेक ट्रॅक्टरचालक फक्त एकाच हेडलाईटचा वापर केला जाते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनधारकाची फसगत होते. समोरून मोटार सायकल येत आहे या अंदाजाने वाहन चालवत असतात पण ट्रॅक्टरजवळ आल्यावर वाहनचालकाच्या लक्षात येते. त्यामुळे समोरून येणारी वाहने ट्रॅक्टवर आदळण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे सिंगल व डबल ट्रॅक्टरच्या मागे ब्रेक लाईट नसतो. फक्त रिफेलेक्टरच्या अंदाजाने वाहन चालवावे लागते. अनेक ट्रॅक्टर ट्रॉलीना रिफलेक्टर नाहीत तर काही ट्रॉलींना जुनेच रिफलेक्टर असल्याने ते खराब झाले आहेत. ट्रॅक्टरच्या मागे एक लाईट असावा अशी सूचना ट्रॅफिक पोलिसांकडून दरवर्षी केली जात असताना ट्रॅक्टर चालक दुर्लक्ष करतात. तसेच आरटीओ विभागही ट्रॅक्टर चालकांना मागे लाईट लावण्याबाबत पाठपुरावा करत नाहीत.
अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात जनजागृतीपर कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाते. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेषतः ट्रॅक्टर व बैलगाडीवर रिफलेक्टर लावले जातात. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जानेवारी महिन्यात होतो. तर उसाचा हंगाम नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सुरू होतो. रिफलेक्टर लावण्याची मोहीम जानेवारीऐवजी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सुरू करण्याची गरज व्यक्त केली जाते. रिफलेक्टर लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेकडे विशेष निधी असतो. या विभागांनी लवकर रिफलेक्टर लावण्यासाठी पावले उचलली तर काहींचे जीव वाचू शकतात अथवा अपघात टाळण्यास मदत होऊ शकतो.