वार्ताहर/आवळी बुद्रुक
तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथील चाळीस- पंचेचाळीस वर्षे अतिक्रमणच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला. सरपंच आनंदा पाटील, सदस्य,स्थानिक नेते व मंडल अधिकारी शिवाजी भोसले यांच्या निर्णायक कृतीमुळे हा रस्ता अतिक्रमनातून मुक्त झाला.
गेली कित्येक वर्षे गावांतर्गत असणारा हा रस्ता जवळपास अस्तित्वहीन ठरला होता. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाल्याने गल्लीवाल्यांबरोबरच अन्य ग्रामस्थांचीही मोठी कुचंबणा होत होती. ग्रामपंचायतीच्या वतीने हा रस्ता होण्यासाठी वारंवार प्रयत्न झाले. पण संबंधितांकडून सतत विरोध होत राहिला. वारंवार होणाऱ्या बैठकांमधून अनेकजण आपले अतिक्रमण निघेल या भूमिकेने विरोध करत राहिले आणि रस्ता न होता उलट अतिक्रमणे वाढतच राहिली. अखेर सरपंच आनंदा पाटील तसेच सदस्य व स्थानिक नेते मंडळींनी कणखर भूमिका घेत मंडल अधिकारी शिवाजी भोसले यांना या रस्त्याबाबतची अडचण सांगितली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणे काढण्याबाबतची धडक कृती करण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी ग्रामपंचायत व अतिक्रमणाशी संबधितांना नोटीस लागू केली . काल तातडीने पोलिस बंदोबस्तासह जेसीबी बोलावले व प्रत्यक्ष अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.
काहीजणांनी या कामास विरोध केला.यावेळी संबंधितांची बाजू ऐकून घेत प्रशासन ही कारवाई करण्यावर ठाम असल्याचे ठासून सांगितले.यावेळी स्थानिक नेत्यांनीही ‘रस्ता महत्त्वाचा आहे, त्याला विरोध करू नका’ अशी संबंधितांची समजूत घातली. आणि बघता बघता अतिक्रमणे निघून या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. यावेळी महसूल विभागाचे परिसरातील कर्मचारीही उपस्थित होते.