गोकुळ शिरगाव / वार्ताहर :
कणेरी तालुका करवीर येथील कणेरी फाटा ते कणेरीमठपर्यंतचा रस्ता मुरमाची होणारी अवजड वाहन वाहतूक व प्राधिकरणे पाण्यासाठी खोदलेल्या चरी व त्यांनी सोडलेले हेअर हॉल यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे, हा रस्ता मुख्यता औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, शिवाय कणेरी मठाकडे येणारे पर्यटक, भक्तगण या रस्त्यावरून वाहतूक करतात. आत्ताच शाळा देखील चालू झाल्याने विद्यार्थीसुद्धा याच रस्त्यावरून ये-जा करतात. पहाटेच्या वेळी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणारे तरुण वयस्कर मंडळी याच रस्त्यावरून आपला व्यायाम व सकाळचा वॉकिंग करतात .गेल्या एक महिन्यापासून मुरूम ओढण्यासाठी या रस्त्यावरून दहा चाकाचे मोठे शेकडो डंपर असून ही वाहतूक रात्रंदिवस चालू आहे. त्यामुळे या रस्त्यावर या अवजड वाहनांची वाहतूक चालू झाल्याने या रस्त्यावरून वर्दळ करणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या अवजड वाहतूकीवर वेळीच याच्यावर उपाय योजना काढून यांना पर्यायी मार्ग देणे अथवा ही वाहतूक फक्त रात्रीच दहा ते पहाटे पाच पर्यंतच चालू ठेवण्याची परवानगी देणे अत्यंत गरजेचे बनले आहे .अन्यथा मोठा अनर्थ झाल्यावरच प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ जागे होणार आहेत का? असा सवाल या ठिकाणावरून विचारला जात आहे.
प्राधिकरणे काढलेले एयर हॉल हेसुद्धा अगदी रस्त्याला चिकटूनच चांगले आठ ते दहा फुटाचे व सिमेंट काँक्रीट मध्ये पिलर उभा केल्याने हे एअर हॉल सुद्धा अत्यंत धोकादायक स्थितीत वाटताहेत. पाण्याच्या पाईपसाठी उकरलेल्या चरी ह्या अर्धवट स्थितीतच तशाच याठिकाणी पडलेल्या आहेत. अगदी रस्त्याला चिटकून या चरी असल्याने सायकलवरून ये-जा करणारे, मोटरसायकल वरून जाणारे वाहतूकदार यांना या चरी धोकादायक आहेत. त्यामुळे हा रस्ता आधीच प्राधिकरणे पाईपलाईनसाठी उकरून या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या लोकांना पुरते हैराण झाले होते. त्यातच अवजड वाहतूक चालू झाल्याने औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे.