यमगे / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.त्यामुळे नदीकाठच्या मुरगुड व परिसरातील गावांमध्ये पुराचा धोका वाढल्याची माहिती समजताच मुंबईत असलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाशी तातडीने संपर्क साधत मुरगूड व परिसरासाठी अत्याधुनिक बोटिंसह पुण्याहून एनडीआरएफची टीम तातडीने रवाना केली.आज मुरगुड ता कागल येथे एनडीआरएफ टीम चे स्वागत आणि लाईफ बोटचे पूजन कागलच्या तहसील तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष राजेखान जमादार,नामदेवराव मेंडके,बाजीराव गोधडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याधिकारी संजय गायकवाड,सपोनि विद्या जाधव नगरसेवक विशाल सूर्यवंशी,संदीप कलकूटकी,जयसिंग भोसले पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसाने मुरगूड आणि परिसरातील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे.निपाणी – राधानगरी राज्यमार्गावर मुरगुडनजीक पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पाणी आल्याने मुरगुडपासून दौलतवाडी व पुढे कापशीचा संपर्क तुटला आहे.तसेच मुरगुड -कुरणी, भडगाव तसेच मुरगूड-वाघापूर दरम्यानचे मार्गही पुरामुळे बंद आहेत.पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती अधिकच भीषण होणार आहे.
गत वर्षी महापुरात मंत्री मुश्रीफ यांनी या भागास भेट दिली होती या वर्षीही तसा धोका असल्याचे ओळखून मुश्रीफ यांनी तातडीने एनडीआरएफ टीम बोलावण्याचा निर्णय घेतला.
मुरगुड व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.यामधून जवळपास चार ते पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहर व परिसरातील लोकांमध्ये प्रचंड घबराट होऊ लागली आहे. आदमापुर येथील बाळूमामा भक्तनिवास याठिकाणी कोवीड केअर सेंटर निर्माण केले असले, तरी महापुरामुळे मुरगूडचा संपर्क तुटला आहे. त्यामुळेच शिवराज महाविद्यालय याठिकाणी 10 ऑक्सिजनच्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे अत्यवस्थ रुग्णांवर याच ठिकाणी उपचार करणे शक्य होणार आहे.
कायमस्वरूपी ॲम्बुलन्सची उपलब्धता…
मुरगूड परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत, तसेच पुढील उपचारासाठी रुग्णाचे हाल होऊ नयेत म्हणून कोवीड केअर केअर सेंटर येथील एक जादाची ॲम्बुलन्स मुरगूड येथे कायमस्वरूपी उपलब्ध ठेवली आहे, असे तरुण भारतशी दूरध्वनीवरून बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
“लवकर पुढे या…. लवकर बरे व्हा “!
याचबरोबर कोरोना सदृष्य लक्षणे आढळताच नागरिकांनी तातडीने तपासणी करून घेण्याची गरज आहे. वेळीच उपचार झाले तर हा आजार नियंत्रणात राहू शकतो. दुखणं अंगावर काढून वेळाने उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हे गांभीर्य वेळीच ओळखून नागरिकांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. तसेच महापुराच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचे व अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच रहा व सुरक्षित राहा, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.