सर्व व्यवहार राहणार बंद
प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यात कोरोनाचा फैलाव जोरात होत असल्याने रुग्णांची व दगा होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १० ते १६ सप्टेंबर अखेर संपूर्ण तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त दवाखाने औषध दुकाने व संकलन काळासाठी दूध संस्था सुरू राहणार असून नियमबाह्य वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
राधानगरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. जिल्ह्यात विविध तालुके अनेक दिवसांसाठी बंद करण्यात आले. मात्र राधानगरी तालुक्यात याबाबत कोणतीही निर्णय घेतला जात नव्हता. तालुक्यातील काही गावांमध्ये बंद केला जात आहे. मात्र साखळी तोडण्यासाठी संपूर्ण तालुका लॉकडाऊन करावा अशी मागणी जनतेतूनच होत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तालुक्यातील सरपंच व पदाधिकारी यांची बैठक होण्यासाठी आवाहन केले. त्यानुसार राधानगरी येथे सरपंच, अधिकारी व पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत गुरूवार १० सप्टेंबर ते बुधवार १६ सप्टेंबर अखेर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदमधून दवाखाने, औषध दुकाने व केवळ दूध संकलन काळासाठी दूध संस्थांना वगळण्यात आले आहे. नियम मोडणारे नागरिक अथवा दुकानदार, व्यावसायिक यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.